व्हीएसआरएस न्युज मुंबई-प्रतिनिधी बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा जुलैअखेर घेऊन, 15 ऑगस्टपर्यंत निकाल आणि 1 सप्टेंबरपासून व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे नियोजन आहे.
तर बीए, बीकॉम, बीएससी अशा विनाव्यावसायिक अभ्यासक्रमांची सीईटी घ्यावी आणि घेऊ नये, असे दोन प्रवाह आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात बारावीचे निकाल हाती आल्यानंतर कुलगुरूंशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. प्रवेशापासून कोणीही वंचित राहणार नाही, असेही उदय सामंत यांनी सांगितले.
सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी शिक्षण केंद्राचे सामंतलवकरच लोकार्पण
कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक जनता आपलीच आहे. त्यांना मराठीतून शिक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्राच्या हद्दीत शिवाजी विद्यापीठाच्या प्रयत्नातून कौशल्यपूर्ण पाच अभ्यासक्रम सुरू करीत आहोत.
लवकरच स्वतःच्या जागेत हे शैक्षणिक संकुल निर्माण करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लवकरच होईल, असे शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी 3 कोटी
शिवाजी विद्यापीठातील बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी आजपर्यंत 50 लाख, एक कोटींचा निधी देण्याची घोषणा अनेकांनी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी तीन कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा अध्यादेशही काढण्यात आला आहे. शिवाय ग. गो. जाधव अध्यासन केंद्रासाठीही 50 लाखांचा निधी आठ-दहा दिवसांत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले.