व्हीएसआरएस न्युज मुंबई-प्रतिनिधी येत्या 15 सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत. याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे, असं उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून शिक्षणाचा खेळ खंडोबा झाल्याचं चित्र आहे. शाळा , महाविद्यालये बंद असल्यानं यंदा ऑनलाईन शिकवण्या घेण्यात येत आहे. कोरोना आटोक्यात आल्यानं महाविद्यालये पुन्हा सुरू होतील अशी अपेक्षा होती. मात्र, डेल्डा प्लस व्हारियंटमुळे राज्यात पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहेत. यातच आता उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महत्वाची घोषणा केली आहे.
कोरोना संकटकाळात नागपूर विद्यापीठाने शैक्षणिक शुल्कात कपात करून विद्यार्थ्यांना सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे इतर विद्यापीठांनीदेखील शुल्ककपातीचा निर्णय घ्यावा, असं आवाहन ते कुलगुरूंना करणार आहेत.
गेल्या दोन वर्षापासून प्राध्यापक भरती कोरोनामुळे थांबली होती. ही भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पहिला टप्पा म्हणून 3 हजार 74 प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती पुढील आठवडयापासून सुरू करण्यात येईल. तसेच 121 जागांवर ग्रंथपाल भरती तसेच विद्यापीठातील 659 जागांवर शिक्षकीय भरती करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असंही उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, 21 जूनपासून नेट-सेट पीएचडी पात्रताधारक उमेदवार भरतीसाठी आंदोलन करत आहेत. आता आज उदय सामंत यांनी केलेल्या घोषणेनंतर त्यांनी आपला निषेध मागे घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता नेट-सेट आणि पीएचडी पात्रताधारक उमेदवारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
Discussion about this post