जेजुरी | (व्हीएसआरएस न्यूज) | जेजुरी गडाचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून पुनर्विकास करण्यासाठी राज्य सरकारने १०९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. येत्या १५ दिवसांत याबाबतचा कार्यादेश निघण्याची शक्यता आहे. विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात गडपायथा आणि शहराच्या विकासाचे नियोजन करण्यात येत आहे. गडावर पूर्वी सुमारे १५० दीपमाळा होत्या. कालौघात त्या नामशेष झाल्या. त्यातील अधिकाधिक दीपमाळांचे संवर्धनही या पहिल्या टप्प्यात होणार आहे.
मंदिराचे काम मुख्यत्वे दगडांत केलेले आहे. त्यामुळे जीर्ण झालेले दगड बदलण्यात येणार आहेत. तसेच सुस्थितीत असलेल्या दगडांना चमकदार करण्यात येणार आहे. गडावर पूर्वी १५० दीपमाळा असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व दीपमाळा सध्या पुनर्स्थापित करता येणे शक्य नसले, तरी त्यातील अनेक दीपमाळा पुन्हा उभारण्यात येणार आहेत. सध्याच्या दीपमाळांचे संवर्धन दगडांना बदलून चमकदार केले जाणार आहे. हे काम मुख्यत्वे चुन्यात केले जाणार आहे. जेजुरी गडावरील मंदिराच्या विकासाचे, तसेच संवर्धनाचे काम या टप्प्यात होणार आहे.
मंदिराचा गडावरील परिसर १२४० चौरस मीटरचा असून पहिल्या टप्प्यातील कामात मंदिराचे संवर्धन आहे त्या स्थितीत केले जाणार आहे. त्यासाठी १७ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. गडाचे ऐतिहासिक, धार्मिक महत्त्व लक्षात घेता हे काम राज्य पुरातत्त्व विभागामार्फत केले जाणार आहे. याच कामासाठीची दुसरी १८ कोटींची निविदाही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मंदिर व्यवस्थापनाकडून तात्पुरती डागडुजी करण्यात येते. ती परिस्थितीनुसार असली तरी अभ्यासपूर्ण नसते. त्यामुळे अशा डागडुजीला आता नवे स्वरूप मिळणार आहे.
मंदिर संवर्धनाचा पहिला टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यात शहराचा विकास, रस्ते, पाणी, निवासी व्यवस्था याचा आराखडा तयार केला जात आहे. लवकरच त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल, असे पुणे जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर म्हणाले.
Discussion about this post