पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | विद्यार्थ्याबरोबर असलेल्या मित्राने बिबट्यावर दगड भिरकावून त्याची सुटका करण्याचा प्रयत्न केला. खेड तालुक्यातील धुवोली गावात बारावीतील विद्यार्थी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची दुर्देवी घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर धुवोली गावात शोककळा पसरली. अजय चिंतामणी जठार (वय १७) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
अजय बारावीत वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. चार दिवसांपूर्वी त्याची बारावीची परीक्षा संपली. अजय आणि त्याचा मित्र साई वाळुंज शुक्रवारी (१७ मार्च) सायंकाळी सातच्या सुमारास रानात जनावरे आणण्यासाठी गेले होते. त्या वेळी रानात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अजयवर हल्ला केला. त्या वेळी प्रसंगावधान राखून साईने बिबट्याच्या दिशेने दगड भिरकावला. बिबट्याने अजयवर हल्ला केला. त्याला ओढत दाट झाडीत नेले. अजयच्या मानेला गंभीर इजा झाली.
साईने आरडाओरडा केला. ग्रामस्थांनी त्याचा आवाज ऐकला. गंभीर जखमी झालेल्या अजयला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अजयचा मृत्यू झाल्याचे समजताच गावात शोककळा पसरली.
बिबट्याचा हल्ल्यांमुळे नागरिक भयभीत
बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिक सायंकाळनंतर घराबाहेर पडत नाहीत. खेड, मंचर भागात बिबट्यांच्या हल्ल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. चार दिवसांपूर्वी खेड तालुक्यातील भिवेगावात बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. भिवोली गावात बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
Discussion about this post