पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असताना हा अपघात झाल्याचीही माहिती समोर आली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या एका भीषण अपघातामध्ये तीनजणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात महामार्गावरील उर्से गावाजवळ झाल्याची माहिती शिरगाव पोलिसांनी दिली आहे. कारमध्ये बसलेल्या तीनजणांचा यात मृत्यू झाला असून अद्याप या तिघांची नावे समजू शकलेली नाहीत. सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार (MH04 JM 5348) ही मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत होती. उर्से गावाजवळ चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि समोरच्या ट्रकला या कारनं मागच्या दिशेनं जोरात धडक दिली. या भीषण अपघातात चालकासह दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात अत्यंत भीषण असल्याने यात कारच्या बॉनेटसह पुढील भागाचा चुराडा झाला.
कारची अवस्था इतकी वाईट होती की कारचा पत्रा कटरने कापून आतील मृतदेह बाहेर काढावे लागले. या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. शिरगाव पोलिसांनी ही वाहतूक कोंडी सोडवली असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास शिरगाव पोलिस करत आहेत.
Discussion about this post