व्हीएसआरएस मराठी न्युज- दुःख_आपला_माणूस_गेल्याचे_व_काळसोकावल्याचेही
तल्लख बुद्धिमत्ता – मार्मिक विनोदबुद्धी – गल्लीपासून दिल्लीपर्यंतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतच्या अद्ययावत इत्यंभुत माहितीपट आणि प्रचंड मोठ्या काळाचा इन सायक्लोपीडिया सोबतीला भारदस्त राजबिंडे व्यक्तिमत्व असे आमचे नबाब साहेब निर्वतले आणि माझ्या भाव विश्वातील एक अढळ तारा निखळल्याचे दुःख झाले.नवाब साहब शरीराने जरी गेले असले तरी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे संस्कार त्यांची साथ-संगत व मला लाभलेले दीर्घ मार्गदर्शन माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला सोबत निश्चित करेल,कारण या माणसात प्रचंड बुद्धिमत्ता तर होतीच मात्र त्यांच्या ठाई असलेल्या प्रेम-स्नेह-जिव्हाळा-आपुलकी-सहिष्णुता-तारतम्य-तार्किकता व माणुसकी यांच्या अनोख्या संगमातून झिरपणारे नाते व्यक्तीश गेले तीन दशके मला लाभले. नवाब साहेब गेल्याची वार्ता कळल्यापासून काहीतरी महत्त्वाचे हरवलेले आहे ही भावना आणि हळहळ जाणवत आहे.
माझे वाडवडिलांचे गाव देऊळघाटच्या कुशीतच वसलेले आहे, तेव्हा स्वाभाविकच वडिलोपार्जित स्नेहसंबंधांचा धागा नवाब साहेब यांचे परिवाराशी होताच. 75 वर्षापूर्वी समाजात शिक्षणाचा अभाव होता त्यात सदर पंचक्रोशीतील माझे वडील बहुजन समाजातील पहिले ग्रॅज्युएट माझ्या व आई यादेखील ग्रॅज्युएट असल्यामुळे चांगलाच संवाद होता. सातत्याने नवाब साहेबांची उठबस आमच्या घरी होत असल्याचे बालपणापासून स्मरणात आहे. बुलढाणा जिल्हा निर्मितीच्या पूर्वी जुन्या व्यवस्थेत जिल्हा म्हणजे परगणा असे सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यात देऊळघाट व जानेफळ असे दोन परगणे होते.नवाब परीवार हे देऊळघाट परगण्याचे जहागीरदार देऊळघाट येथेल गढी,नबाबांचा वाडा तर संपूर्ण गावाला परकोट असा सशक्त वारसा घेऊन नवाब साहेब जन्माला आले. पुढे-पुढे राजवटी बदलल्या-व्यवस्था बदलल्या-परिस्थिती बदलली आणि नेमके तेव्हाच नवाब साहेब ऐन तारुण्यात होते तो फाळणीचा जातीय दंगली,जाहागीरदारी संपुष्टात आलेली परिस्थिती या सर्वांची झळ त्यांना सोसावी लागली मात्र त्यांच्या विवेकात,विचारात व खानदानी सभ्यतेवर कुठलाही परिणाम त्यांनी होऊ दिला नाही. त्यांचे नेतृत्वाचे असणारे संबंध उच्चभ्रू लोकांशी असणारे नातेगोते तात्कालीन कुटुंबाचे वर्चस्व हे सर्व बघता नवाब साहेबांना पाकिस्तानात जाणे सहज शक्य होते, नव्हे नव्हे तर व्यावसायिक/आर्थिक दृष्टिकोनातून तो सौदा त्यांना फायदेशीर राहू शकला असता,मात्र मातृभूमीशी असणाऱ्या प्रेमापोटी नवाब साहेबांनी पाकिस्तान मध्ये न जाता भारतातच राहण्याचा निर्णय घेतला.जर ते पाकिस्तानात गेले असते,तर त्यांना मोठी हवेली-जमीन जुमला व शिक्षण असल्यामुळे मोठी नोकरी देखील मिळू शकली असती, मात्र याचा कधीही पश्चाताप त्यांच्या आचार-विचार-व्यवहार आणि उच्चारात कधीही आढळून आली नाही तर मादरे वतन ची सेवा यालाच प्राधान्य त्यांच्या ठायी सर्वोच्च होते तथा भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामावर तात्कालीन स्वातंत्र्यसंग्रासेनांनीवर तथा भारताच्या भविष्यात स्वीकारल्या जाणाऱ्या समाजवादी राजकीय ढाच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. त्यांचे चुलते पाकिस्तानात गेले पुढे लंडनला स्थायिक झाले त्यांच्याबद्दल त्यांनी कधी स्वतःची तुलना केली नाही अथवा मोठेपणा मिरवीला नाही आज लंडनमध्ये त्यांच्या चुलत्यांच्या घराचे नाव “देऊळघाट हाऊस” आहे, कदाचित मातृभूमीची ओढ दिसून येत असावी. बुलढाणा संगम चौक परिसरात त्यांची बरीच मोठी इस्टेट होती तिथे एक टुमदार बंगला देखील होता बुलढाणा जिल्हा घोषित झाल्यानंतर इंग्रज अधिकाऱ्यांना राहण्याकरता तो एकमेव पर्याय त्यावेळी उपलब्ध होता. विश्वव्याख्यात “कॉम्प्रेशन ऑफ ठग” हे पुस्तक नवाब साहेबांच्या बुलढाण्याच्या बंगल्यात लिहिल्या गेले होते. यासारख्या अनेक घटना किस्से आहे का या जहागीरदार नवाब साहेबांबद्दल सांगता येतील मात्र या सर्वांच्या पुढे जाऊन नवाब श्री सईदउल्लाह खान साहेबांचे व्यक्तित्व व जीवन जगण्याची रीत समजून घेण्यासारखी आहे आणि हीच त्यांना श्रद्धांजली ठरू शकेल. देऊळघाट ते बुलढाणाच्या दरम्यान नवाब साहेबांच्या वडिलांनी उंच उंच असणारे झाडे लावली होती,त्यांना लांब देठाचे पांढरे शुभ्र फुले हमखास मोहरत असत व रस्ता भार या फुलांचा सडा पडत असे,त्या फुलांचे नाजूक-देखणे रूप व दरवळणारा सुगंध माझ्या बालबोध वयात माझ्या चित्ती पक्का वसला तो थेट नवीन घर बांधत असतांना परिसरात वृक्षारोपण करतेवेळी त्या झाडांचा दूर दूर पर्यंत विशेष शोध मोहीम राबवून ती दहा झाडे आणून लावली, कदाचीत यालाच ऋणानुबंध म्हणत असतील !
मी राजकारणात नवखा असताना कार्यकर्ता म्हणून वावरत असे १९९७ साली जिल्हा परिषद निवडणूक आल्या तेव्हा देऊळघाट जिल्हा परिषद सर्कलचे नवाब साहेब जि प सदस्य होते निवडणुका घोषित होण्याच्या सहा महिने पूर्वी मला त्यांनी बोलावून घेतले व सांगितले की आता आम्ही वयस्कर झालो आहोत, भावी पिढीकडे राजकारण सुपुर्त केले पाहिजे मी आता निवडणूक न लढता तुझ्या पाठीशी उभ राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि स्वतःचा जिल्हा परिषद मतदार संघ माझ्यासाठी खुला करून दिला. त्यावेळेस त्यांनी पुन्हा तिकीट मागितले असते तर त्यांनाच उमेदवारी मिळाली असती ते थांबले माझे नाव पुढे केले म्हणून मला वयाच्या 26 व्या वर्षी पहिली वहिली निवडणूक लढता आली व तोच माझ्या राजकीय जीवनातील टर्निंग पॉईंट ठरला त्याच निवडणुकीमुळे राजकारणात एवढा मोठा पल्ला मला गाठता आला याची कृतज्ञता मला व्यक्ति करावीशी वाटते.
असे आमचे नवाब साहेब आदरणीय सईदउल्लाह खान यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले.मोठा मुलगा अलीगड युनिव्हर्सिटी प्रोफेसर आहे तर लहान मुलगा सालस व्यक्तिमत्व लाभलेला एडवोकेट शहजाद शिरानी दुर्धर आजाराने ग्रस्त आहे.नवाब साहेबांना धाकट्या लाडक्या मुलाला आजारी बघून ज्या यातना झाल्या असतील त्याची कल्पना करवत नाही. त्यांना सद्गगती तर मिळणार आहेच, शांती लाभो ही प्रार्थना या निमित्ताने करतो तथा त्यांचा सामाजिक राजकीय वारसा पुढे घेऊन जाण्याचे वचन देखील त्यांना श्रद्धांजली अर्पित करीत असतांना देतो.कुठे कमीपडत असेल तर त्वरीत परखड शब्दात सूचना करणारा व चांगले काही केल्यास भरभरून कौतुक करणारा सोबतच प्रगतीची काळजी करणारे माझे पाठीराखे (सरप्रस्त) नसणे खटकणारे आहे.
#प्रिय_सईदउल्लाह_खान_साहेबांना_भावपूर्ण_आदरांजली_श्रद्धांजली_भावांजली
ता.क- अलीकडच्या काळात नबाब साहेबांचा व्हिडीओ शूट करण्याची योजना होती,ज्यात गावाचा-परिसराचा-जिल्ह्याचा इतिहास त्या काळातील घटना आणी अनुषंगीक परिवर्तन व वाडवडलांचा ठेवा जतन करणे हा हेतू होता,मात्र माझ्या वेढळटवृत्ती मुळे अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंटेशन करणे राहून गेले.
Discussion about this post