पिंपरी-चिंचवड | (व्हीएसआरएस न्यूज) | सद्यस्थितीमध्ये शहराला दैनंदिन पाणीपुरवठ्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या पवना धरणातील पाणी साठा ऑगस्ट पर्यंत पुरेल एवढाच आहे. पिंपरी-चिंचवड शहराची पाण्याची गरज लक्षात घेता आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. 2023-24 मधील येणारा पावसाळा एल निनो परिणामामुळे प्रभावित होऊन सरासरीपेक्षा बराच कमी होण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. सध्यस्थितीत शहरास होणारा एकूण पाणीपुरवठा 575 द.ल.लि. प्रतिदिन इतका आहे. एकूण लोकसंख्या अंदाजे 30 लाख इतकी असून सध्या एकदिवस आड पाणीपुरवठा सुरू आहे. अपेक्षित पाऊस कमी झाल्यास माहे ऑक्टोंबर अखेर पवना धरणातील शिल्लक पाणीसाठा लक्षात घेऊन त्या अनुषंगाने जून 2024 अखेरपर्यंतच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.
यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी पाणीपुरवठ्याबाबतीत आराखडा तयार करणेबाबत पाणीपुरवठा विभागांस सूचना केल्या, त्यानुसार महापालिकेच्या तसेच खाजगी बोअरवेल सर्वेक्षण आणि त्यांची दुरुस्ती करणे, आवश्यकतेनुसार बोअर व विहिरी अधिग्रहण करणेबाबत माहिती संकलित करणे, पाणी कपात धोरण निश्चित करणे,रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करणे, पाणी गळती टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच आंद्रा धरणातून निघोजे येथे 100 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी उपसा करून चिखली येथील नवीन केंद्रामधून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर सुमारे 100 दशलक्ष लिटर पाणीतूट भरून काढण्यात येणार आहे.
यासह भामा आसखेड धरणातून 165 दशलक्ष लिटर पाणीउपसा करीता प्रकल्प गतिमान करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीस सह शहर अभियंता श्रीकांत सवणे,कार्यकारी अभियंता रामनाथ टकले,अजय सुर्यवंशी,डी.डी.पाटील यासह उप अभियंता,कनिष्ट अभियंता उपस्थित होते.
Discussion about this post