व्हीएसआरएस मराठी न्युज -चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात.
श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत खंडोबाची उपासना जास्त केली जाते. खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते. मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. नवरात्राचे पांच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात.
खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा आहे. भंडारा म्हणजे हळदीची पूड. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यांत दही व मीठ घालतात.), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यांत असतात. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधि असतो.
तळी भरणे- म्हणजे एका ताम्हनात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हन “सदानंदाचा येळकोट” किंवा “एळकोट एळकोट जय मल्हार” असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात.
कथा अशी आहे की आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन ‘मणी’ व ‘मल्ल’ दैत्यांचा वध केला. ‘मल्हारी मार्तंड’ हा महादेवाचा एक अवतार होता. कृतयुगात ब्रह्म देवाने मणी व मल्ल राक्षसांना वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही. हे वर प्राप्त केल्यावर ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले. त्यांचा हा त्रास बघून ऋषीमुनींनी देवांकडे मदत मागितली. तेव्हा भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपले ७ कोटी अर्थात येळकोट सैन्य घेऊन राक्षसांवर चालून गेले. मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाची छाती फोडून त्याला जमिनदोस्त केले. तसेच मणी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे अशी इच्छा व्यक्त केली. भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले.
नंतर मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाचा पराभव केला, तेव्हा त्याने शरण जाऊन तुमच्या नावाआधी माझे नाव जोडले जावे अशी मागणी केली. तथास्तु म्हणून मार्तंड भैरवाने तेही मान्य केले. तेंव्हापासून त्यांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाते.
Discussion about this post