व्हीएसआरएस मराठी न्युज -आज संत चोखोबा तथा चोखामेळा महाराजांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या मृत्युचा नक्की दिनांक माहिती नसला तरी परंपरेनं आजच्या तिथीला चोखोबांची आठवण काढली जाते.
चोखोबांविषयी आपल्याला फार माहिती नाही. ते संत नामदेवांचे शिष्य होते. त्यांच्या परिवारातील अन्य लोक म्हणजे, त्यांची पत्नी सोयरा, बहिण निर्मळा, मेहुणा बंका आणि मुलगा कर्ममेळा हेही चोखोबांप्रमाणेच विठ्ठल भक्तीत रमलेले होते. चोखोबांचा मृत्यु मंगळवेढे येथे गावकुसाचे काम करीत असतांना झाला असे म्हणतात. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता, यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात.
चोखोबांचे हे सारे अभंग म्हणजे मानवतेला लागलेल्या भेदभावाच्या अस्पृश्यतेच्या गलिच्छपणाचे जीवंत पुरावे आहेत. हा तोच माणूस आहे ज्याविषयी पुढे तुकोबांनी म्हटले की, ‘तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ। तारिले पतित तेणे किती।।’ चोखोबांच्या विचारांची ही थोरवी आहे. जातीयतेच्या पाशातून आपण अजूनही पूर्णपणे सुटलेलो नाही. ती कायद्याने गेली तरीही मनातून गेलेली नाही. माणूस हा केवळ माणूस असतो, त्याचे विचार आणि आचार जर उत्तम असेल तर तो उत्तम मानावा. तसा तो नसेल तर त्याला माणूस करण्यासाठी प्रयत्न करावेत पण त्याचा अस्विकार अपमान करू नये. चोखोबांचे जगणे आठवतांना मन हेलावून जाते की ज्याने आयुष्यभर विठ्ठलाचे नामस्मरण केले त्याला एकदाही पंढरपुरातील विठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन घेता आले नाही. कारण त्याला मंदिरात जाण्यास मनाई होती. कारण त्यांची जात. विठ्ठलही आपल्या या अनन्य भक्तासाठी कधी मंदिर सोडून बाहेर आला नाही. कारण तोही तिथल्या बडव्यांचा गुलामच होता. आज परिस्थिती निश्चित थोडी बदलली आहे. त्यासाठी चोखोबांसारख्या असंख्यांना मात्र आपल्या प्राणासही मुकावे लागले आहे. अशी वेळ कोणावर येणार नाही, आपल्या हातून कधी असले अस्पृश्यतेचे हीन कृत्य घडणार नाही याची मनाशी खूणगाठ बांधणे हीच या विठ्ठल भक्ताला उचित श्रद्धांजली ठरेल. त्यांत आपण कोणीही कमी पडणार नाही याचा विश्वास आहे.
Discussion about this post