व्हीएसआरएस मराठी न्युज -अदानी समूहातील गुंतवणुकीमुळे भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)च्या शेअर्सचे ७८ हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.
यावरुन काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. याप्रश्नी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि तपास यंत्रणांच्या मौनावर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सूरजेवाला यांनी दावा केला की, एलआयसी आणि एसबीआयने अदानी समूहामध्ये गुंतवणूक करणे सुरूच ठेवले आहे, हिंडेनबर्ग संशोधन अहवालात समभागाच्या किमतीत फेरफार आणि समूहाच्या बाजूने आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाल्यानंतरही गुंतवणूक केली जात आहे. एलआयसीचा पैसा हा जनतेचा आहे! हिंडेनबर्गच्या अहवालानंतर, अदानी समूहाच्या शेअर्समधील एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्य ७७,००० कोटी रुपयांवरून ५३,००० कोटी रुपयांवर घसरले. २३,५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय एलआयसीला २२४४२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
एवढं होऊनही एलआयसी अदानी समूहात ३०० कोटींची गुंतवणूक का करत आहे, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस नेत्याने दावा केला की अहवाल प्रकाशित झाल्यानंतर, एसबीआयच्या स्टॉकची मार्केट कॅप तब्बल ५४,६१८ कोटी रुपयांनी घसरली आहे. याशिवाय एसबीआय आणि इतर बँकांचे अदानी समूहाकडे सुमारे ८१,२०० कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा दावा त्यांनी केला. या सगळ्या दरम्यान, SBI कर्मचारी पेन्शन फंड आणि SBI Life अजूनही अदानी समूहात २२५ कोटी रुपयांची गुंतवणूक का करत आहेत, असा मोठा प्रश्न सुरजेवाला यांनी विचारला आहे. २४ ते २७ जानेवारी दरम्यान, SBI आणि LIC एकट्याने त्यांच्या शेअर्सच्या मूल्यात ७८,११८ कोटी रुपयांचे मार्केट कॅप गमावल्याचे सुरजेवाला यांनी स्पष्ट केले आहे.
Discussion about this post