व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी, पुणे (दि. ३० जानेवारी २०२३) सत्य परमात्म्याला प्रकट करण्याची साधना म्हणजे धर्म होय. माणसाला सत्कर्म करण्यात ज्यातून प्रेरणा मिळते ती प्रेरणा म्हणजे धर्म होय.
असे प्रतिपादन प. पू. सद्गगुरू शिवकुमार महास्वामीजी, बिदर यांनी येथे केले.
दि.२८ जानेवारीपासून एक फेब्रुवारी पर्यंत भोसरी येथे प.पू. सद्गुरु शिवकुमार महास्वामीजी, बिदर यांचा अध्यात्मिक सोहळा गुरुदर्शन व प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळात ही प्रवचने होणार आहेत. रविवारी प्रवचनापूर्वी सायंकाळी भक्ती संगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
यानंतर धर्मो रक्षती रक्षिता या विषयावर प.पू. सद्गुरु शिवकुमार महास्वामीजी यांचे प्रवचन झाले. यावेळी ते म्हणाले की, माणसाच्या मनात धर्मापेक्षा अधर्म अहंकार जास्त निर्माण होतो. त्याला मी काय करतो, काय बोलतो याचे भान राहत नाही. धर्म ही गुढ व सूक्ष्म बाब आहे त्यामुळे बऱ्याच वेळा धर्म करायला जाऊन अधर्म होतो. सत्य परमात्म्याला प्रकट करण्याची साधना म्हणजे धर्म होय असे ते म्हणाले. शाश्वत शांती सुख ज्यापासून मिळते त्याला धर्म म्हणता येईल असे प्रतिपादन सद्गुरु शिवकुमार महास्वामीजी यांनी केले.
पुण्याशिवाय काही होत नाही. मात्र पैसे दान करण्यासाठी ज्याप्रमाणे पैशाची गरज आहे त्याप्रमाणे पुण्य करण्यासाठी पुण्य पदरी असायला हवे. पुण्य पदरी असेल तर पुण्याची बुद्धी त्याच्या मनात निर्माण होईल व अधर्म होणार नाही. त्यासाठी शरीर मन अथवा वाणी द्वारा आपल्याकडून हिंसा अथवा पाप होणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. वाणी, मन, शरीराने पुण्य कर्म करत नाही तो धर्मरक्षण करू शकत नाही. जो माणूस कर्म करत नाही पूजा पाठ अथवा काम करत नाही केवळ पैसा हाच परमेश्वर मानून त्याच्या पाठीमागे धावतो तो पापी माणूस होय असे सद्गुरु शिवकुमार महास्वामीजी म्हणाले. केलेल्या कर्माचे चांगले फळ मिळण्यासाठी देश, काळ, परिस्थिती योग्य हवी असेही ते म्हणाले. सुख शांती धन्यता हवी असेल तर धर्माचे रक्षण करा धर्माच्या रक्षणाविना कीर्ती यश शांती शक्य नाही असे सद्गुरु शिवकुमार महास्वामीजी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन श्री सद्गुरु सिद्धारूढ अध्यात्मिक समिती, पुणे आणि परमपूज्य शंकरानंद स्वामीजी संस्थापक तसेच अध्यक्ष अमरनाथ माना, सचिव रमेश गंताले, रमेश कोहल्ली, शिवपुत्र संतपुरे, सूर्यकांत मुरुड, रवींद्र चांगलेरा, अण्णासाहेब बिरादार, चंद्रशेखर गाणगेर, वीरेंद्र काळे, संतोष बिराजदार, भक्ती धनुरे यांनी केले आहे. कार्यक्रमानंतर महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सद्गुरु सिद्धारूढ अध्यात्मिक समिती पुणे यांनी केले आहे.
Discussion about this post