व्हीएसआरएस न्युज मुंबई-प्रतिनिधी पावसाच्या पाण्याचा निचरा सर्वाधिक वेगाने करणारे मॅनहोल पालिकेने पावसाळ्याआधी सुरक्षित केले आहेत. या मॅनहोलवर सुरक्षेसाठी लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत.
त्यामुळे मॅनहोल पाण्यात दिसत नसल्याने मनुष्य त्यात पडला तरी वाहून न जाता अडकला जाणार आहे. अतिवृष्टीत संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेने आवश्यकता असलेल्या मुंबई शहरातील 855, पश्चिम उपनगरातील 355 आणि पूर्व उपनगरांतील 186 मॅनहोलवर सुरक्षेसाठी लोखंडी जाळ्या बसवल्या आहेत. मुंबईत एकूण 73 हजारांवर मॅनहोल आहेत.
कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण यंत्रणा काम करीत असताना पालिकेने पावसाळापूर्व कामेही पूर्ण करताना नालेसफाई, रस्ते, रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे केली आहे.
यामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी ठिकठिकाणी असणारे मॅनहोलही लोखंडी जाळ्या बसवून सुरक्षित करण्यात आले आहेत. मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरांतील विभागात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे बसवण्यात आले आहे. यामध्ये पाइप, पेटिका आणि आर्च ड्रेनचा समावेश आहे. या जाळ्यांच्या देखभालीसाठी मॅनहोल (मनुष्य प्रवेशिका) बसवण्यात आल्या आहेत. मात्र या खोल जलवाहिन्या उघडय़ा राहिल्यास त्यामध्ये पडून जीवितहानी होण्याचा धोका असतो. त्यामुळे मॅनहोल लोखंडी जाळ्या बसवून सुरक्षित करण्यात आले आहेत.
ऑगस्ट 2017 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत पालिकेच्या सेवेत असलेले पोटविकार तज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्यामुळे धोकादायक मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला. अतिवृष्टी झाल्यास काही ठिकाणी साचणाऱया पाण्यात मॅनहोल उघडा असल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर शहर आणि दोन्ही उपनगरांतील मॅनहोलवर जाळ्या बसवून ते सुरक्षित करण्यात आले आहेत.