व्हीएसआरएस मराठी न्युज –माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ या अभियानाअंतर्गत राज्यात आतापर्यंत साडेचार कोटी महिलांची तपासणी करण्यात आली. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह यासह कर्करोग, हृदयविकारांचे प्रमाण लक्षणीय आहे.
या काळात सकाळी 9 ते दुपारी 2 या दरम्यान वैद्यकीय अधिकारी आणि स्त्रीरोगतज्ज्ञांमार्फत 18 वर्षावरील अविवाहित, नवविवाहित महिला, गरोदर माता, 30 वर्षावरील महिला यांची तपासणी, औषधोपचार, सोनोग्राफी आणि समुपदेशन करण्यासाठी मेडिकल, डेंटल शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.
आरबीएसके पथकामार्फत शाळा तपासणीनंतर गावात भेट देऊन तपासणी आणि समुपदेशन कार्यक्रम घेतले जात आहेत. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी महिला व बाल कल्याण विभागाच्या समन्वयाने हे कार्यक्रम अंगणवाडी केंद्रात आयोजित केलेले आहेत.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी शून्य ते १८ वयोगटातील सर्व बालकांच्या आरोग्याची सर्वांगिण तपासणी करण्याची संकल्पना मांडली असून आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही महत्त्वाकांक्षी आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळा, महापालिकांच्या शाळा तसेच खाmगी शाळा आणि अंगणवाड्यातील बालके अशी सुमारे दोन कोटी ९२ लाख मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने ही मोहीम राबविण्यासाठी नियोजन केले असून यात आरबीएसकेचे डॉक्टर, भरारी पथकांचे डॉक्टर,समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या मदतीने व्यापक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात जिल्हा रुग्णालयांपासून प्राथिमक आरोग्य केंद्रांपर्यंतच्या सर्व स्तरांवर ही तपासणी केली जाणार असून महापालिका पातळीवर पालिका आयुक्तांच्या माध्यमातून महापालिका रुग्णालयांच्या मदतीने तपासणी मोहीम करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
Discussion about this post