व्हीएसआरएस मराठी न्युज –
राज्यातील विविध रक्तपेढय़ांमध्ये अवघे ५६ हजार युनिट रक्त उपलब्ध असून, उन्हाळय़ाच्या सुट्टीमुळे रक्त संकलनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रक्ताची वाढती गरज लक्षात घेऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून करण्यात आले आहे.
उन्हाळय़ाच्या सुट्टीत (एप्रिल – मे महिन्यात) नागरिक मोठय़ा प्रमाणात गावाला किंवा बाहेरगावी जातात. त्यामुळे रक्तदानाचे प्रमाण कमी होते. परिणामी, राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. यंदा उन्हाचा तडाखा वाढल्याने रक्ताची मोठय़ा प्रमाणात गरज भासण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यातील विविध रक्तपेढय़ांमध्ये अवघे ५६ हजार ७०८ युनिट इतके रक्त उपलब्ध आहे. तसेच सध्या दररोज ५ हजार युनिट रक्त लागत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या उपलब्ध असलेले रक्त किमान ११ ते १२ दिवस पुरण्याची शक्यता आहे.
शिबिरांच्या माध्यमातून संकलित करण्यात आलेल्या रक्तावर विविध प्रक्रिया केल्यानंतर सहा तासांनी ते वापरता येते. त्यानंतर त्या रक्ताचे आयुष्य ३५ दिवसांचे असते. या कालावधीत रक्ताचा वापर न केल्यास ते वाया जाते. त्यामुळे आवश्यकतेनुसार रक्त संकलित करण्यावर भर देण्यात येत असल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
Discussion about this post