व्हीएसआरएस मराठी न्युज -पुढील पाच दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून तापमान ४२ अंशाच्या वर जाण्याची शक्यता आहे. याबाबत नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं (RMC Nagpur) अंदाज वर्तवला आहे.
राजस्थान व गुजरातसह अन्य राज्यांतील लाटसदृश वातावरणामुळे विदर्भात सध्या उन्हाच्या झळा जाणवत आहेत. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा जाणवत असून अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आजपासून म्हणजेच २९ मार्चपासून २ एप्रिलपर्यंत विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विदर्भाला यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज अकोला, बुलडाणा आणि नागपूर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ३० मार्चला अकोला, बुलडाणा, नागपूर, यवतमाळ, अमरावती, ३१ मार्चला अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर आणि यवतमाळ, १ एप्रिलला अकोला आणि बुलडाणा, तर २ एप्रिलला देखील अकोला आणि बुलडाणा या दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कशी घ्याल काळजी? –
- उष्णतेची लाट आल्यानंतर आपण थेट उन्हाच्या संपर्कात येणं टाळलं पाहिजे. शरीराचं तापमान शक्य तितकं थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा. महत्वाच्या कामासाठी बाहेर पडायचं असेल तर उन्हापासून स्वतःचं संरक्षण करावे.
- शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवावं. तहान लागली नाही तरी मुबलक प्रमाणात पाणी प्यावं. त्यामुळे शरीर थंड राहील.
- हलक्या रंगाचे, सुती कपडे परिधान करावेत. घराबाहेर पडल्यानंतर डोकं कापडाने झाकावं.
- ORS, लिंबू सरबत, तांदळाची पेज, ताक आदी पेय पिण्यास प्राधान्य दाव्या, तसेच चहा-कॉफी, मद्यपान, सॉफ्ट ड्रिंकचं सेवन टाळावं. यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं.
Discussion about this post