व्हीएसआरएस न्युज राज्य शिक्षण मंडळातर्फे होणाऱ्या अकरावीच्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) एकूण 10 लाख 98 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
त्यापैकी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्ससह (सीआयएससीई) अन्य बोर्डांच्या 36 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आली.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर करण्यात आला. राज्यातील सहा महापालिका क्षेत्रात केंद्रीय पद्धतीने प्रवेश होत असून, त्यापूर्वी राज्य मंडळातर्फे सीईटी घेतली जाणार आहे. या सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीची राज्य मंडळाने 2 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती.
या मुदतीमध्ये एकूण 11 लाख 96 हजार 532 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. त्यापैकी 76 हजार 86 विद्यार्थ्यांचा अर्ज अपूर्ण राहिला, तर 22 हजार 128 विद्यार्थ्यांनी अर्ज भरूनही सबमिट केला नाही. तर 10 लाख 98 हजार 318 विद्यार्थ्यांनी अर्ज सबमिट केला. त्यापैकी 35 हजार 814 विद्यार्थी अन्य मंडळांचे आहेत, असे माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावी निकालात 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जांची संख्या पाहता सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज भरला नसल्याचे दिसून येत आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक 2 लाख 55 हजार अर्ज मुंबई विभागातून भरले गेले आहेत. तर सर्वात कमी 20 हजार 566 अर्ज कोकण विभागातून भरले गेले आहेत. मुंबई खालोखाल पुणे विभागातून 1 लाख 32 हजार 255 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत, असेही राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले.
Discussion about this post