व्हीएसआरएस मराठी न्युज -आतापर्यंत मंत्रालयात प्रवेश करताना सामान्य नागरिकांच्या खिशात तंबाखू व गुटख्याच्या पुड्या आहेत का याचाही शोध घेतला जात होता. आता पाण्याच्या बाटलांचाही शोध पोलिसांनी सुरू केला असून पाण्याच्या बाटल्या असल्यास प्रवेशद्वाराजवळ काढून ठेवल्या जात आहेत.
दक्षिण मुंबईत असलेल्या आकाशवाणीच्या समोरच्या प्रवेशद्वाराजवळून मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेश दिला जातो. हा प्रवेश देताना पोलिसांकडून सर्वांची कसून तपासणी करण्यात येत आहे. संबंधित नागरिकांकडे आवश्यक ते ओळखपत्र आणि गेट पास असल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. त्याशिवाय, पोलिसांकडून सध्या पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन जाण्यास मनाई केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी मंत्रालयात येऊन विषप्राशन करण्याचा प्रयत्न झाला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून गृह विभागाने पाण्याच्या बाटल्यांवर बंदी घातली आहे. मंत्रालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये याविरोधात तीव्र नाराजी उमटत आहे.
आपल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आणि मागण्यांच्या पूर्ततेसाठी अनेक नागरिक मंत्रालयाच्या फेऱ्या गाठत असतात. मात्र, मंत्रालयात समस्येवर तोडगा न निघाल्यास अनेक जण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात.
त्यानुसार अनेकांनी आतापर्यंत मंत्रालयात लावण्यात आलेल्या सुरक्षित जाळीवर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे या आत्महत्या अथवा अत्महत्येच्या प्रयत्न थांबविण्यासाठी गृह विभागाने अनोखा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, मंत्रालयात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
काम झाले नाही, वा न होणारे काम प्रशासनाने करावे या हट्टापोटी अनेक जण पाण्याच्या बाटल्यांमधून कीटकनाशक वा रॉकेल घेऊन येतात. ते प्राशन करण्याचा वा अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा आत्महत्यांच्या प्रयत्नांना रोखण्यासाठी गृह विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे समजते.
Discussion about this post