व्हीएसआरएस मराठी न्युज –सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर आणि मनगोळी या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना झटका बसला आहे. या दोन्ही ग्रामपंचायत निवडणुकीत देशमुख गटाला नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
देशमुख गटाला मनगोळीत एक जागा मिळाली आहे. मात्र, चिंचपूरमध्ये तर भोपळाही फोडता आलेला नाही. यातील चिंचपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने, तर मनगोळीत काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळविला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतीसाठी गुरुवारी (ता. ४ ऑगस्ट) मतदान झाले होते. त्याचा निकाल आज (ता. ५ ऑगस्ट) जाहीर झाला आहे. त्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर आणि मनगोळी ग्रामपंचायतींचा समावेश होता. यामध्ये राज्यातील सत्ताधारी भाजपचे सुभाष देशमुख गटाला हार पत्कारावी लागली आहे. या दोन्ही ग्रामपंचायतीवर यापूर्वी भाजपच्या सुभाष देशमुख गटाचेच वर्चस्व होते, त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशमुख गटाला हा धक्का आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर प्रथमच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या गटाने विजयाचे खाते उघडले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सातपैकी सात सदस्य निवडून आले आहेत. शिवसेनेचे माजी आमदार रतिकांत पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या गटाकडे चिंचपूर गावची सत्ता आली आहे. या ठिकाणी भाजप आमदार आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाला झटका बसला आहे.
दरम्यान, तालुक्यातील मनगोळी ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षांनी मिळून ग्रामदैवत अमोगसिद्ध बहुजन ग्रामविकास पॅनेलच्या सहापैकी पाच उमेदवारांनी बाजी मारली आहे. मागील १५ वर्षांपासून या ठिकाणी असलेल्या भाजपच्या सत्तेला खिंडार पाडण्यात हसापुरे यांना यश आले आहे. भाजपचे माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनेलला मात्र एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायती भाजपच्या पर्यायाने सुभाष देशमुख यांच्या हातून निसटल्या आहेत. विजयी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत हलगीच्या तालावर जल्लोष साजरा केला आहे.
Discussion about this post