व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे- माध्यम क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे पत्रकारांना 24 तास काम करावे लागत आहे. अलीकडे पत्रकारांमध्ये महिलांची संख्याही मोठी आहे. याची दाखल घेवून पत्रकारांचे ‘ड्यूटी आवर्स’ ठरवण्याची गरज आहे. तसेच त्यांना स्थैर्य देण्यासाठी ही पत्रकारांच्या संघटनांनी काम करणे गरजेचे आहे,
अलीकडचे पत्रकार जणूकाही एखाद्याची सुपारी घेतल्यासारखे वार्तांकन करताना दिसतात.अशा पत्रकारांना आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. नवोदित पत्रकारांसाठी ज्येष्ठ पत्रकारांच्या कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत. जेणेकरून प्रशिक्षणार्थी पत्रकारांना त्यांच्या अनुभवातून अभ्यासपूर्ण माहिती मिळेल. तसेच सध्यस्थितीत खऱ्या पत्रकाराची गरज का आहे? याचे महत्त्व पटेल. यामुळे मुंबई पुण्यातील पत्रकारांना एक व्हिजन देण्याचे काम होईल. त्याच बरोबरीने इतर जिल्ह्यातील पत्रकारांना एक व्यासपीठ उपलब्ध होईल.
पत्रकारांच्या आयुष्यात स्थिरता कशी आणता येईल, त्यावर काम करायला हवे. पत्रकारांना घरे द्यायला हवीत.
त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तरतूद हवी. तसेच पत्रकारांची गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यांनाही एखादी फेलोशिप देऊन परदेशातील शिक्षण पाहण्याची संधी देता येईल का? यावर काम करायला हवे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
पाटील म्हणाले, पत्रकारिता हे मिशन आहे. त्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. नवख्या पत्रकारांना शिक्षण देण्यासाठी पुणे किंवा मुंबई येथे सेंटर सुरू करता येईल का? याविषयी काही करायला हवे. पत्रकारितेच्या कार्यशाळा हव्यात, त्यासाठी मी प्रयत्न करेन.
Discussion about this post