व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी: महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ती दिनविशेष यादीमध्ये नुकतेच छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा समावेश करण्यात आला आहे. परंतू त्या परिपत्रकामध्ये महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याने शंभूप्रेमीमधून नाराजी उमटू लागली आहे. त्यामुळे सदरील गंभीर चूक तात्काळ दुरुस्त करून दिनविशेष यादीमध्ये आदरपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करुन सुधारित परिपत्रक जाहीर करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
याबाबत दिपक खैरनार यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द आव्हानांनी भरलेली होती. अगदी लहानपणापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्या संकटांवर महाराजांनी समर्थपणे मात ही केली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण विश्वाला दिपवणारा तेजोमय पराक्रम छत्रपती संभाजी महारांजी केला. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर किंवा त्यानंतरही अनेक मोहिमा छत्रपती संभाजी महाराजांनी यशस्वीपणे राबवल्या.राजेंनी आपल्या कार्यकाळात एकूण १२० युद्धे लढली. कोणत्याही मोहिमेत त्यांना कधीच अपयश आले नाही. असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते.राजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं दैदीप्यमान योगदान न विसरता येण्यासारखं आहे. नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ती दिनविशेष यादीमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, जाहीर करण्यात आलेल्या दिनविशेष यादीमध्ये ‘संभाजी महाराज जयंती’ असा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. यातून राजांच्या कार्यकर्तृत्वाचा अवमान होत आहे, हि अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.त्यामुळे तात्काळ हि चूक दुरुस्त करून दिनविशेष यादीमध्ये आदरपूर्वक ‘छत्रपती संभाजी महाराज जयंती’ असा उल्लेख करुन सुधारित परिपत्रक जाहीर करण्यात यावे, अशी मागणी दिपक खैरनार यांनी केली आहे.
Discussion about this post