व्हीएसआरएस मराठी न्युज –राज्यातील सत्तासंघर्षवर आज शेवटची सुनावणी पार पडत असून ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात शिंदे गट आणि राज्यपालांना पुन्हा एकदा घेरलं आहे.
16 आमदारांवर होणारी अपात्रतेची कारवाई थांबवता येणार नाही. अविश्वास प्रस्ताव आणि अपात्रतेची कारवाई या दोन वेगवेगळ्या गोष्टी असून विश्वास प्रस्ताव आल्यानंतरही अपात्रतेची कारवाई होतेच असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
यावेळी त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. सरकार पाडण्यासाठी राज्यपालांचा वापर करण्यात आलं. राज्यपालांची भूमिका घटनाबाह्य आहे. कोणत्या घटनात्मक आधारावर राज्यपाल एखाद्या विधिमंडळ गटाच्या एका गटाच्या दाव्यावर बहुमत चाचणीचे आदेश देऊ शकतात? असा सवाल त्यानी केला. निवडणूक आयोगाने निर्णय देण्यापूर्वीच राज्यपालांनी विधीमंडळ पक्षाला राजकीय पक्षाची मान्यता दिली. म्हणजेच निवडणूक आयोगचे काम राज्यपालांनी केलं असं म्हणत सिब्बल यांनी राज्यपालांना कोंडीत पकडलं आहे.
कपील सिब्बल यांनी शिंदे गटाच्या वेगवेगळ्या भूमिकेवरही बोट ठेवलं. आधी शिंदे गटाने सांगितलं की आम्ही पक्षप्रमुखाना कंटाळून बाहेर पडलो नंतर ते म्हणाले की आम्ही मूळ राजकीय पक्ष आहोत. आता ते म्हणतात आम्ही पक्षातच आहोत असं म्हणत कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या भूमिकेला उघड पाडलं. मुख्यमंत्री बनण्यासाठी शिंदेनी सरकार पाडलं आणि त्यांच्या बेइमानाचे बक्षीस म्हणून त्यांना मुख्यमंत्री बनवलं असा मोठा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.
Discussion about this post