व्हीएसआरएस मराठी न्युज -मातंग साहित्य परिषदेच्या वतीने राजभवन, मुंबई येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते साहित्य, लोककला व समाजसेवा क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना ‘मातंग समाजमित्र’, ‘मातंग समाजरत्न’ व ‘विशेष सन्मान’ प्रदान करण्यात आले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी हभप भगवान बाबा आनंदगडकर व भटक्या विमुक्त जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांना मातंग समाजमित्र पुरस्कार देण्यात आले. तर साहित्यिक चंद्रकांत वानखेडे यांना विशेष कार्याकरिता मातंग समाजरत्न पुरस्कार देण्यात आला. विशेष कार्याबद्दल प्रा. अरुण आंधळे, राजन लाखे, डॉ.अशोक कांबळे, प्रा. ईश्वर नंदापुरे, सुनील वारे, डॉ. संजय देशपांडे, शाहीर नंदेश उमप, लोकगायिका राधिका खुडे आदींना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी मंचावर हभप शिवाजीराव मोरे, डॉ. रमेश पांडव, डॉ. अंबादास सगट व मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांमध्ये समाजातील मागास घटकांच्या विकासासाठी देशात कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येक घरी वीज, शौचालय व नळाचे पाणी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे मातंग समाजासह सर्व मागास समाज घटकांचा विकास होऊन त्यातून सक्षम नेतृत्व पुढे येईल, असा आशावाद राज्यपालांनी व्यक्त केला.
Discussion about this post