व्हीएसआरएस मराठी न्युज बुलढाणा(प्रतिनिधी),दिनांक 3 जून:-अखिल भारतीय काँग्रेसच्या उदयपुर येथिल नवसंकल्प चिंतन शिबारातील घोषणापत्राच्या अनुषंगाने माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी राजीव गांधी पंचायत राज संघटनच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
गत दहा वर्षांपासून हर्षवर्धन सपकाळ राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहे. उदयपूर शिबिरातील घोषणा पत्राच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उपाध्यक्षपदाचा आपला राजीनामा पक्षाकडे गत आठवड्यात सादर केला आहे.
ऑगस्ट 2013 मध्ये मणिशंकर अय्यर यांच्याकडील राजीव गांधी पंचायत राज संघटनेचा कार्यभार तात्कालीन खासदार मीनाक्षी नटराजन तथा हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपविण्यात आला होता. तद्नंतर 2014 मध्ये सपकाळ विधानसभेत पोहोचल्यानंतर सहा महिन्याच्या आतच त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव नियुक्त करण्यात आले होते. प्रथम अडीच वर्ष गुजरात तदनंतर पाठोपाठ मध्यप्रदेश राज्याची महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. सदर कार्यात व्यस्त असल्याने बराच काळ त्यांना प्रभारी राज्यामध्ये व राजीव गांधी पंचायत राज संघटनेस देणे भाग पडले होते, याचा मोठा राजकीय फटका 2019 च्या निवडणुकीत त्यांना बसला होता. विधानसभा निवडणुकीच्या पराभवाच्या पश्चात एक वर्षाने 2020 मधे सचिव पदावरून कार्यमुक्त करीत संपूर्ण वेळ राजीव गांधी पंचायतराज संघटनेत काम करण्याच्या सूचना पक्षपातळीवर वरून त्यांना मिळाल्या होत्या,पुढे सव्वा दोन वर्षांनी मात्र पंजाबच्या बिघडलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पुनश्च अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव नियुक्त करण्यात आले होते.
आता नवीन निकषानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर कार्यमुक्त होत दोन वर्ष दूर राहिल्यामुळे सचिवपदी सपकाळ कायम राहणार आहेत,तर राजीव गांधी पंचायत राज संघटन च्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाचा मात्र त्यांनी राजीनामा दिलेला आहे.
Discussion about this post