व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -कोरोना संक्रमणामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा दहीहंडीचा उत्सव होत आहे. शिंदे सरकारने दहीहंडी दरम्यान गोविंदाचा मृत्यू झाल्यास १० लाखांचा विमा कवच देण्याची घोषणा केल्यानंतर आता दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्य सरकारने नोकऱ्यांमध्ये खेळाडूंना दिलेल्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ आता गोविंदांनाही मिळणार आहे.
गेल्या बऱ्याच वर्षांपासून दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गोविंदा आणि पथकांकडून करण्यात येत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा पथकांची ही मागणी पूर्ण केली आहे. दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली आहे. दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळाल्यामुळे गोविंदांनाही याचा फायदा होणार आहे.
खेळाचा दर्जा मिळाल्यामुळे गोविंदांना सरकारी नोकरीत खेळाडूंसाठी असणाऱ्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर महाविद्यालयीन गोविंदांना खेळातील ग्रेस मार्कही मिळू शकतात. त्याचबरोबर दहीहंडीच्या सरावाला गोविंदांना कॉलेजच्या वेळेतूनही जायची परवानगी मिळू शकेल.
दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गोविंदाचा मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना ७.५० लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर हात-पाय जायबंदी झालेल्यांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. विम्याबाबतचा निर्णय फक्त या वर्षीसाठी लागू असेल.
Discussion about this post