कोल्हापूर । व्हीएसआरएस न्यूज ।
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर गुरुवारी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ‘नवाब मलिक यांना आम्ही कोणत्याही गावात फिरू देणार नाही. त्यांना तत्काळ ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली पाहिजे. इतकेच नाही, तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हाच दाखल केला पाहिजे’, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यानंतर पाटील यांनी मलिक यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांच्याबाबतीत आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांचे ‘आ बैल मुझे मार’, असे असते. ‘आ बैल मुझे मार’, हे त्यांनी स्वत:हूनच मान्य केलेले आहे. ज्यांना टाडाखाली अटक झाल्यानंतर दोन दिवसांनी जप्त होणारी त्यांची जमीन, मलिक यांनी दोन दिवस आधीच त्यांच्याकडून अंडरस्टँडिगने स्वस्तात घेतली, असे पाटील म्हणाले.
पाटील यांनी उदाहरण देताना सांगितले की, ‘एसटीमध्ये मी प्रवास करतो. माझे मुन्ना महाडिकांना दोनशे रुपये द्यायचे होते. तेवढ्यात एसटीत चोर शिरतो. मला माहीत आहे की, आता चोर सगळ्यांचे पैसे काढून घेणार आहे. हे ओळखून मी मुन्ना महाडिक यांचे दोनशे रुपये पटकन देऊन टाकतो. माझ्या दोनशे रुपयांची फिट्टमफाट झाली. याप्रमाणे जसे दोन दिवसांनंतर टाडा लागणार होता आणि जमीन जप्त होणार होती, ती जमीन मलिक यांनी स्वस्तामध्ये घेतली हे त्यांनी मान्य केले आहे. म्हणून ‘एनआयए’मार्फत त्यांची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. त्यांना ‘एनआयए’ने ताबडतोब चौकशीसाठी बोलवावे आणि हा देशद्रोह असल्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. मुंबईतील बॉम्बस्फोटाशी संबंधित लोकांशी यांचे संबंध आहेत’. दरम्यान, बॉम्बस्फोटाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीशी आपले संबंध नसल्याचे मलिक यांनी या आधीच स्पष्ट केले आहे.
Discussion about this post