मुंबई । व्हीएसआरएस न्यूज ।
येत्या जुलै महिन्यात मराहाराष्ट्रातील सहा राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. यातील पाच जागांवरील उमेदवारांच्या नावाची यादी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, सहाव्या जागेवरून राज्यात राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे छत्रपती यांची टर्म संपली आहे. आता स्वराज्य नावाच्या संघटनेमार्फत त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत राज्यातील सर्व आमदारांना पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादीनेही सुरुवातीच्या काळात छत्रपतींना पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं. मात्र, यावरून यूटर्न घेत शिवसेनेला पाठिंबा दिला.
सेनेने छत्रपतींना शिवबंधन बांधण्याची ऑफर दिली होती. मात्र राजेंनी ती धुडकावल्याने राज्यसभेचा मार्ग त्यांच्यासाठी अवघड झाला. अखेर सेनेने कोल्हापुरातूनच जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी देत खेळी केली. आता या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे.
संभाजीराजे राज्यसभेच्या शर्यतीतून माघार घेण्याची शक्यता वाढली आहे. सकाळीच त्यांनी ट्वीट करत माझी बांधिलकी जनतेशी असल्याची पोस्ट केली. यानंतर चर्चा वाढल्या आहेत. मविआच्या आमदारांनी त्यांना पाठिंबा देण्यास असमर्थता दर्शवल्याने त्यांच्यावर ही वेळ ओढावल्याची चर्चा आहे. त्यातच भाजपने देखील त्यांना जाहीर समर्थन दिलेले नव्हतं. त्यामुळे दिल्लीसाठी आकड्यांची समीकरणं जुळवताना संभाजीराजेंना कसरत करावी लागली.
अखेर संभाजीराजे यांनी या लढतीतूनच माघार घेणार असल्याचं कळतंय. दरम्यान, संजय राऊत आणि संजय पवार यांनी त्यांचे राज्यसभेचे अर्ज दाखल केले आहेत. उद्या संजय राऊत थेट कोल्हापुरात जाऊन कार्यर्त्यांची भेट घेणार आहेत. तर शनिवारी राऊत यांची सभा पार पडणार आहे.
सेनेची ऑफर आणि पवारांची खेळी…भाजपचा सस्पेन्स
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष लढणार असल्याचं संभाजीराजेंनी जाहीर करताच शरद पवार यांनी राष्ट्रवादीकडून जाहीर पाठिंबा देत खेळी केली. यानंतर शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं सांगत राष्ट्रवादीच्या नेत्यानी यू टर्न घेतला. शिवसेनेने राजेंना पक्षप्रवेश करण्याची ऑफर दिली. यातून राजकारण आणखी वेगळ्या वळणावर गेलं. सहावी जागा भाजपच्या गोटातून रिक्त होत आहे.
विकास महात्मे यांच्या जागी चाचपणी सुरू होती. मात्र भाजपला संख्याबळाचं समीकरण साधण्यात घाम गाळावा लागणार असल्याने महाविकास आघाडीला त्यामध्ये सरशी मिळणार आहे. यंदा भाजपच्या जागा कमी झाल्या. शिवसेनेकडे मविआ सरकारमधील सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या जागेवर सेनेचा नेता जाणार असल्याचं स्पष्ट झालं. ——-
Discussion about this post