मुंबई । व्हीएसआरएस न्यूज ।
आर्थिक स्थिती खालावत चालल्याची गंभीर दखल रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी चार सहकारी बँकांवर निर्बंधांसह दंडाची पुढील सहा महिन्यांसाठी कारवाई केली. याअंतर्गत दंडाची रक्कम या बँकांना भरावी सलागणार आहे, त्याचबरोबर बँकेच्या खातेदारांवर रक्कम काढण्यासाठी निर्बंधही लागू करण्यात आले आहेत.
रामगढिया सहकारी बँक (नवी दिल्ली), साहेबराव देशमुख सहकारी बँक (मुंबई), सांगली सहकारी बँक (मुंबई) आणि शारदा महिला सहकारी बँक (टुमकूर, कर्नाटक) या चार सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने वरील तकारवाई केली आहे. या बँकांवर बँकिंग नियमन कायदा, १९४९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या चारही बँकांचे दैनंदिन कामकाज शुक्रवारी संपल्यानंतर निर्बंधांचा कालावधी सुरू झाला. यानुसार या बँकांना रिझर्व्ह बँकेच्या परवानगीखेरीज नवी कर्जे देता येणार नाहीत, नव्या गुंतवणुका करता येणार नाहीत तसेच कोणत्याही नव्या ठेवी स्वीकारता येणार नाहीत. निर्बंधांमध्ये ठेवीदारांना रक्कम काढण्यावरही बंधने घालण्यात आली आहेत.
रामगढिया सहकारी बँकेच्या ठेवीदारांना तसेच साहेबराव सहकारी बँकेच्या ठेवीदारांना प्रत्येकी ५० हजार रुपये काढता येतील. सांगली सहकारी बँकेच्या ठेवीदारांना ४५ हजार रुपये काढता येतील. शारदा महिला सहकारी बँकेच्या ठेवीदारांना कमाल सात हजार रुपये काढता येणार आहेत. या बँकांवर दंड आणि निर्बंध लावण्यात आले असले तरी या बँकांचे परवाने रद्द करण्यात आलेले नाही, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
Discussion about this post