मुंबई । व्हीएसआरएस न्यूज ।
अयोध्या दौरा जाहीर झाल्यावर त्याला विरोध सुरू झाला. त्याची माहिती दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेशातून मिळाली. हा सगळा सापळा असल्याचं माझ्या लक्ष्यात आलं आणि त्याला रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली, असं मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. मनसैनिक सापळ्यात अडकू नये म्हणून दौरा स्थगित केल्याचं राज यांनी सांगितलं. त्यावरून आता काँग्रेसनं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.
अयोध्या दौऱ्याविरोधात रसद महाराष्ट्रातून. भाजपा खासदारानेच विरोध केल्याने हा थेट फडणवीसांवर आरोप, असल्याचं काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करून म्हटलं आहे. ‘मी सांगितले ते सत्य ठरले. अयोध्येत गेलो असतो तर केसेस टाकल्या असत्या. कोणी? योगी सरकारने. तिथे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार नाही. त्यामुळे हा सापळा भाजपचाच असल्याचं सावंत यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अयोध्या दौरा का स्थगित केला? राज ठाकरे म्हणतात…
रामजन्मभूमीचं प्रकरण सुरु झालं मात्र त्यावेळी तुमच्यापैकी अनेक जण जन्माला आले नव्हते. त्यावेळी दूरदर्शन होतं, इतक्या वाहिन्या नव्हत्या. मुलायमसिंग यांचं उत्तर प्रदेशात सरकार होतं. त्यावेळी कार सेवकांना ठार मारण्यात आलं होतं. शरयू नदीत तरंगणारी प्रेत मी पाहिली होती. मी माझे मनसैनिक अयोध्येला जाणार होतो. शरयू नदी काठावरील त्या ठिकाणाला भेट देणार होतो. मी अयोध्येला जायचं ठरवलं असतं तर महाराष्ट्रातून हजारो हिंदू बांधवं माझ्यासोबत आले असते, जर तिथं काय झालं असतं तर आपली पोरं अंगावर गेली असती. तुमच्यावर केसेस टाकून तुरुंगात सडवण्यात आलं असतं. मी आपली पोरं हकनाक घालवणार नाही, असं मी बाळा नांदगावकर यांना सांगितलं. मनसैनिकांवर केसेस लावल्या असत्या आणि इथं निवडणुकीच्या वेळी कोणीच राहिलं नसतं, असं राज ठाकरे म्हणाले.
उत्तर प्रदेशात एक खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना विरोध करतो, हा सगळा डाव होता. माझ्यावर टीका होत असेल तर टीका सहन करायला तयार आहे. माझी पोरं अडकू देणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले. गेल्या १४ आणि १५ वर्षांनी जाग आली. राज ठाकरेंनी माफी मागितली तरचं अयोध्येत पाय ठेवू यातून चुकीचे पायंडे पडतात हे सगळ्यांनी लक्षात ठेवाव, असं राज ठाकरे म्हणाले.
Discussion about this post