मुंबई । व्हीएसआरएस न्यूज ।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असती तर राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीयवादी असल्याची टीका केली नसती, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राज ठाकरे यांचा सध्याचा अजेंडा ठरलेला आहे. ते भाजपवर थोडीही टीका करत नाहीत. त्यांच्या टीकेच्या केंद्रस्थानी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीनच पक्ष आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले. यावेळी प्रसारमाध्यमांकडून अजित पवार यांना मनसेला राष्ट्रवादी काँग्रेस फूस देत असल्याच्या आरोपांबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले.
राज महाविकास आघाडीविरोधात स्पष्टपणे बोलत आहेत
मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असती तर राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीयवादी असल्याची टाका केली असती का, हा साधा विचार करा. राज ठाकरे हे सध्या भाजपवर टीका करत नाहीत. ते शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवरच टीका करतात. राज ठाकरे यांचा सध्याचा अजेंडा ठरला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांचा अजेंडा वेगळा होता. त्यावेळी त्यांनी भाजपला टार्गेट केले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली नव्हती. एवढेच नव्हे तर त्यांनी अनेक ठिकाणी अप्रत्यक्षपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचारच केला होता. मात्र, आता ते महाविकास आघाडीच्या विरोधात स्पष्टपणे बोलत आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.
आशिष शेलार यांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर
या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले. २०१७ सालीच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप आशिष शेलार यांनी केला होता. त्यावर अजित पवार यांनी म्हटले की, मग ही गोष्ट २०१७ सालीच सांगायची होती ना. तुम्ही पाच वर्षे कशासाठी थांबलात? २०१७ साली बरेच नेते इकडे-तिकडे होते. त्यामुळे आता मागच्या गोष्टी काढण्यात अर्थ नाही. त्याऐवजी महाराष्ट्रासमोरील मुलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे अजि पवार यांनी म्हटले.
Discussion about this post