मुंबई । व्हीएसआरएस न्यूज।
केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर कशाप्रकारे सुरु आहे, याचे अनिल देशमुख हे मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांच्या घरावर ९० धाडी पडल्या. या प्रकरणात २०० लोकांचे जबाब नोंदवले गेले. प्रशासनात काम करताना असला तपास मी कधी पाहिला नाही, असे खोचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी केंद्रीय तपासयंत्रणांच्या कारभारावरही टीका केली. कुणीही तक्रार करायची आणि नंतर केंद्रीय तपासयंत्रणा त्यांना लक्ष्य करतात, असा प्रकार सध्या सुरु आहे.
अनिल देशमुख यांच्याविरोधात एका पोलीस अधिकाऱ्याने तक्रार केली. त्यानंतर अनिल देशमुख तुरुंगात गेले. ज्यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात तक्रार केली त्यांचाही चौकशी सुरु आहे. चौकशी कशा पद्धतीने आणि कितीवेळा केली जाते, तसेच सत्तेच्या गैरवापराचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे प्रकरण आहे. अनिल देशमुख यांचे कुटुंबीय, सरकारी कर्मचारी आणि अन्य संबंधित लोकांची चौकशी झाली. या प्रकरणात एकूण ९० धाडी पडल्या. यापैकी ५० धाडी ईडी, २० धाडी सीबीआय आणि २० छापे हे आयकर खात्याकडून घालण्यात आले होते. याप्रकरणात तब्बल २०० लोकांचे जबाब नोंदवण्यात आले. प्रशासनात असताना एकाच व्यक्तीच्या घरावर ९० धाडी पडण्याचा प्रकार मी पाहिला नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. मोठ्या साहेबांची सगळीकडे नजर असेल, पण आता शंकराचा तिसरा डोळाही उघडलाय; भाजपचं सूचक ट्विट
यावेळी शरद पवार यांनी शिवसेना नेत्यांवर पडलेल्या धाडीसंदर्भातही भाष्य केले. हे सगळे प्रकार पाहता केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करतंय, हे स्पष्टपणे दिसत आहे. महाविकासआघाडी सरकार पाडण्यात यश येत नाही. त्यामुळे काही ना काही मार्ग वापरले जात आहेत. हे लोकशाहीला अशोभनीय असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. राज्य सरकार या सगळ्याला योग्य ते उत्तर देईल, असेही शरद पवार यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांना संपवायचे आहे का, शरद पवार म्हणाले…
प्रवीण चव्हाण यांच्या व्हीडिओतील संभाषणात शरद पवार यांचा उल्लेख होता. शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना संपवायचे असल्याचेही प्रवीण चव्हाण यांनी व्हिडीओत म्हटल्याचे दिसत आहे. याविषयी शरद पवार यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा शरद पवार यांनी म्हटले की, राजकारणात कोणी कोणाला संपवत नसते. राजकीय प्रतिस्पर्ध्यांमध्ये स्पर्धा असते पण सत्तेचा गैरवापर केला जात नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
Discussion about this post