मुंबई । व्हीएसआरएस न्यूज ।
उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद आणि सत्ता गेल्यावर रश्मी ठाकरे ठाकरे या तुरुंगात जाऊ शकतात, असे खळबळजनक वक्तव्य अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मला कोणताही गुन्हा नसताना तुरुंगात टाकले. त्याची वेदना मी आजही सहन करत आहे. उद्धव ठाकरे यांची सत्ता गेल्यावर रश्मी ठाकरे यांना तुरुंगात जावे लागले तर मी उद्धव ठाकरे यांना,’आता तुम्हाला कसं वाटतंय’, असा प्रश्न नक्की विचारेन. एक दिवस नक्कीच असा येईल, असे नवनीत राणा यांनी म्हटले. नवनीत राणा यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. अलिबागमधील रश्मी ठाकरे यांच्या १९ बंगल्यांचा मुद्दा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उचलून धरला होता. मध्यंतरी हे प्रकरण थंडावले होते. मात्र, आता भाजप थेट रश्मी ठाकरे यांच्यावरच कारवाई करण्याच्या तयारीत आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
राणा दाम्पत्याने रविवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात भाष्य केले. तुमच्या घरातील स्त्री जेव्हा तुरुंगात जाईल, तेव्हा उद्धव ठाकरे यांना माझी पीडा समजेल. वेदना, तुरुंगातील त्रास आणि वेदना काय असते, हे तुम्हालाही कळेल. कोणताही गुन्हा न करता तुरुंगात घालवायला लागलेल्या क्षणाक्षणाची वेदना उद्धव ठाकरे यांना त्यावेळी कळेल. एक दिवस असा नक्कीच येईल. ज्या दिवशी तुम्ही सत्तेतून आणि मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होईल, तेव्हा मी उद्धव ठाकरे यांना, ‘आता तुम्हाला कसं वाटतंय’, हे नक्की विचारेन, असेही नवनीत राणा यांनी म्हटले. नवनीत राणा यांचे हे वक्तव्य शिवसेनेवरील नव्या वादळाची चाहुल तर नाही ना, अशी कुजबुज आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
यावेळी नवनीत राणा यांनी ‘मातोश्री’ ही सध्या ‘१० जनपथ’च्या आदेशाने चालत असल्याचीही टीका केली. उद्धव ठाकेर यांच्या कालच्या सभेत कोणताही उत्साह नव्हता. केवळ इतरांवर टीका करण्यासाठी ही सभा घेतली होती. मी उद्धव ठाकरे यांना निवडणूक लढवण्याचे आवाहन दिले होते. त्यावरही उद्धव ठाकरे काहीच बोलले नाही. बाळासाहेब ठाकरे हे कधीही सत्तेच्या खुर्चीवर बसले नाहीत. त्यांनी सत्तेबाहेर राहून शिवसेना पक्ष वाढवला, असेही नवनीत राणा यांनी म्हटले.
Discussion about this post