पुणे । व्हीएसआरएस न्यूज ।
अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद आणि कारंजा या ठिकाणी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात झालेल्या या घटनांचा फायदा घेऊन काही समाजकंटक इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्वीटर,फेसबुक इत्यादी समाजमाध्यमांद्वारे दोन समाजांमध्ये आणि गटांमध्ये तेढ निर्माण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याबाबत आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.
त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी हे प्रतिबंधात्मक आदेश काढणे आवश्यक होते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. म्हणूनच मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून वरील घटनेच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून हा आदेश काढण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
वाचा पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्या बाबींवर मनाई केली आहे.
> कोणीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्वीटर, फेसबुक इत्यादी समाज माध्यमांद्वारे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी पसरवणे.
> कोणीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्वीटर, फेसबुक इत्यादी समाजमाध्यमांद्वारे आक्षेपार्ह पोस्ट टाकणे/शेअर करणे, अशी कृत्ये केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रुप अॅडमीनची राहील.
> समाज माध्यमांमध्ये चुकीची माहिती/ अफवा जाणीवपूर्वक प्रसारीत करणे.
> पाच आणि पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येणे, सभा घेणे तसेच शस्त्र लाठी, काठी वाळगणे.
> कोणत्याही प्रकारे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या मजकुराचे फ्लेक्स बोर्ड लावणे आणि त्या प्रकारच्या घोषणा देणे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीवर किंवा व्यक्तींवर भारतीय दंड विधान कायद्याचे कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
Discussion about this post