पुणे । व्हीएसआरएस न्यूज ।
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांची लढाई धार्मिक नव्हती तर ती राजकीय होती. शत्रूच्या स्त्री’चा सुद्धा छत्रपती शिवरायांनी आदर केला. सुडबुद्धीचे राजकारण न करता गुन्हेगारांना कठोर शासन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात शेतकरी, कष्टकरी, कामगार आनंदात होता. दुष्काळसदृश्य काळात सुद्धा शिवरायांनी सर्वांना मदत केली, कुणीही आत्महत्या केली नाही. म्हणून शिवराय हे रयतेचे राजे म्हणून संबोधले जातात. महाराष्ट्रात सध्याचं सुडबुद्धीचे व घाणेरडे राजकारण सुरू आहे. राजकारण्यांनी राजकारणाची अतिशय गलिच्छ पातळी गाठली असून महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला गृहीत धरून चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्राचे राजकारणाची वाटचाल सुरू आहे. आपला देश भारतीय संविधानाने चालतो. देशात लोकशाही आहे. भारतीय संविधानाला अभिप्रेत अशी लोकशाही टिकवायची असेल तर संविधानाला अभिप्रेत असे छत्रपती शासन सध्याच्या महाराष्ट्राला अपेक्षित आहे, तेच झाले पाहिजे असे मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीनिमित्त भारती विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला संभाजी ब्रिगेड पुणे शहराच्या वतीने अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय शिवस्मारक मुंबई मध्ये अरबी समुद्रात न होता जमिनीवर झाले पाहिजे. सात वर्ष झाले उद्घाटन होऊन सुद्धा शिवस्मारकाचे काम सुरु होत नाही. अरबी समुद्रातील शिवस्मारक त्याला संभाजी ब्रिगेडचा विरोध आहे. शिवस्मारक हे जमिनीवरून झाले पाहिजे… यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने 50,000 पोस्टकार्ड लिहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात येणार आहेत. महाराष्ट्रभर आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने ही मोहीम राबवण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ आज भारती विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे जवळ सुरुवात करण्यात आली… अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे पुणे शहर अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी दिली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष महादेव मातेरे, वरिष्ठ उपाध्यक्ष ज्योतिबा नरवडे, सचिव संदीप कारेकर, यशवंत मोरे, सौ. वैशाली मोरे, सनी देशमुख, अभिजीत खेडेकर, सचिन गायकवाड, मानव नरवडे आदी उपस्थित होते.
Discussion about this post