व्हीएसआरएस मराठी न्युज -अहमदाबाद : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने पहिली वन डे मालिका जिंकली.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताने ४४ धावांनी विजय मिळवून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल यांनी फलंदाजीत भारताचा डाव सावरल्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने गोलंदाजीत प्रभाव पाडला. त्याला अन्य गोलंदाजांचीही चांगली साथ मिळाली. प्रसिद्धने ९ षटकांत १२ धावा देताना सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याने तीन षटकं निर्धाव टाकली. भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध मागील ११ वन डे सामन्यांत सलग विजय मिळवला आहे. २००६ मध्ये त्यांना विंडीजकडून अखेरचा मालिका पराभव पत्करावा लागला होता.
दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघाची आघाडीची व तळाची फळी अपयशी ठरली. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना भारताला ९ बाद २३७ धावांपर्यंतच मजल मारू दिली. लोकेश राहुल (४९) व सूर्यकुमार यादव ( ६४) यांनी मधल्या फळीत डाव सावरल्यामुळे इथपर्यंत यजमानांना पोहोचता आले. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. रोहित शर्मा (५) व रिषभ पंत (१८) सलामीला आले, परंतु हा डाव फसला. १२ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रिषभने (१८) उत्तुंग फटका मारला, परंतु जेसन होल्डरने धाव घेत सुरेख झेल टिपला. त्यानंतर ओडीन स्मिथने पुढील चार चेंडू वेगवेगळ्या प्रकारे फेकले आणि सहाव्या चेंडूवर विराटची (१८) विकेट घेतली.
भारताच्या १२ षटकांत ३ बाद ४३ धावा झाल्या होत्या. लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांनी सावध खेळ करताना चौथ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. लोकेश ४८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४९ धावांवर स्वतःच्या चूकीमुळे रनआऊट झाला. सूर्यकुमारने ८३ चेंडूंत ५ चौकारांसह ६४ धावा केल्या. सूर्याने ६व्या विकेटसाठी वॉशिंग्टन सुंदरसह ४३ धावा जोडल्या. दीपक हुडाने अखेरच्या षटकांत चांगली खेळी करताना भारताला समाधानकारक पल्ला गाठून दिला. हुडा २५ चेंडूंत २९ धावांवर बाद झाला. भारताला ५० षटकांत ९ बाद २३७ धावा करता आल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना शे होप आणि ब्रेंडन किंग यांनी सावध सुरुवात केली. पण, ८ व्या षटकात कर्णधार रोहितने प्रसिद्ध कृष्णाला गोलंदाजीला बोलावले. ८व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने किंगला (१८) यष्टिरक्षक रिषभकरवी झेलबाद केले. त्यानंतर १० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डॅरेन ब्राव्हो (१) बाद झाला. मैदानावरील अम्पायरने ब्राव्होला नाबाद दिले होते. पण, रिषभ व प्रसिद्धने कॅचसाठी जोरदार अपील केले. रिषभने राजी केल्यानंतर रोहितने डीआरएस घेतला आणि त्यात बॅट पॅडलला नाही तर चेंडूला लागल्याचे दिसले आणि ब्राव्होला माघारी जावे लागले. युझवेंद्र चहलने आणखी एक धक्का देताना शे होपला (२७) माघारी पाठवले. शार्दूल ठाकूरने चतुराईने जेसन होल्डरला (२) बाद करून विंडीजची अवस्था ५ बाद ७६ अशी केली.
शामर्ह ब्रुक्स व अकिल होसैन ही जोडी टीम इंडियासाठी डोईजड झालेली दिसली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. रोहितने गोलंदाजीत बदल करताना दीपक हुडाला पाचारण केले आणि त्याचा हा डाव यशस्वी ठरला. हुडाने पहिल्याच षटकात विंडीजला मोठा धक्का दिला. ब्रुक्स ६४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ४४ धावांवर माघारी परतला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलेच षटक निर्धाव फेकून हुडाने विकेट घेतली आणि त्यानंतर विराट कोहलीला कडकडून मिठी मारली.
अकिल होसैन आणि फॅबियन अॅलन यांनी सातव्या विकेटसाठी फटकेबाजी करताना ४९ चेंडूंत ४२ धावा जोडल्या. पण, पुन्हा एकदा गोलंदाजीतील बदल यशस्वी ठरला. मोहम्मद सिराजने विंडीजच्या फॅबियनला (१३) माघारी पाठवले. त्यानंतर पुढच्याच षटकात शार्दूल ठाकूरने विकेट घेतली. होसैन ५२ चेंडूंत ३ चौकारांसह ३४ धावांवर बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरने वेस्ट इंडिजची अखेरचा आशास्थान असलेल्या ओडीन स्मिथला माघारी पाठवले. ओडीनचा (२४) सुरेख झेल विराट कोहलीने टिपला. प्रसिद्धने १०वा फलंदाज बाद करून विंडीजचा डाव १९३ धावांवर गुंडाळला.
लोकेश राहुल ( ४९) व सूर्यकुमार यादव ( ६४) यांनी फलंदाजी कमाल दाखवली, पण आजच्या विजयाचा हिरो ठरला तो गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा. त्याने ९ षटकांत १२ धावा देताना सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याने तीन षटकं निर्धाव टाकली. म्हणून त्याला सामना वीर म्हणून गौरविण्यात आले. ‘अशी कामगिरी करण्यासाठी मी बऱ्याच काळापासून प्रयत्नशील होतो. आज त्याला यश मिळाल्याने आनंदीत आहे. त्यासाठी मी काही खास केले नाही, फक्त चेंडू योग्य टप्प्यावर टाकला. मी फलंदाजीला आलो तेव्हा चेंडू वळसा घेत होता, त्यामुळे मला गोलंदाजी कशी करायला हवी याचा अंदाज आहे. आता सातत्यपूर्ण कामगिरी हेच लक्ष्य आहे,’ असे प्रसिद्ध सामन्यानंतर म्हणाला.
भारतीय गोलंदाजाने मायदेशात ४ किंवा त्याहून अधिक विकेट घेत सर्वात कमी धावा देण्याचा विक्रम प्रसिद्धच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्याने १२ धावा देताना ४ विकेट घेतल्या. वन डे क्रिकेटमध्ये किमान ९ षटकं फेकल्यानंतर कमी धावा देणाऱ्या भारतीय जलदगती गोलंदाजांमध्ये प्रसिद्धने दुसरे स्थान पटकावले. जवागल श्रीनाथने २००३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १० षटकांत १३ धावांत ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यात २ निर्धाव षटकं होती. वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे सामन्यातील भारताच्या जलदगती गोलंदाजाची ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. संजीव शर्मा यांनी १९८८मध्ये २६ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर प्रसिद्धच्या ( ४-१२) व मोहम्मद शमी ( ४-१६, २०१९ ) यांचा विक्रम येतो. वन डे सान्यात किमान ४ विकेट्स घेतल्यानंतर सर्वात कमी धावा देणाऱ्या भारतीय जलदगती गोलंदाजांमध्ये प्रसिद्ध तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. स्टुअर्ट बिन्नीने २०१४ मध्ये बांगलादेशविरुद्ध ( ४ धावा) आणि भुवनेश्वर कुमारने २०१३ साली श्रीलंकेविरुद्ध ( ८) वरचढ कामगिरी केली होती. वन डे क्रिकेट कारकीर्दित पहिल्या ६ सामन्यांत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाचा विक्रम आता प्रसिद्धच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्याच्या नावावर ६ वन डे सामन्यांत १५ विकेट्स झाल्या आहेत. त्याने १९८८मध्ये नरेंद्र हिरवाणी यांनी नोंदवलेला १४ विकेट्सचा विक्रम मोडला. अजित आगरकर ( १९९८), प्रविण कुमार ( २००७-०८) आणि जसप्रीत बुमराह ( २०१६) यांनीही पहिल्या सहा वन डे सामन्यांत प्रत्येकी १४ विकेट्स घेतल्या होत्या.
Discussion about this post