हैदराबाद । वृत्तसंस्था ।
आंध्र प्रदेशात नव्याने निर्माण केलेल्या कोनासीमा जिल्ह्याच्या नावाववरून वाद सुरू झाला आहे. जिल्ह्याचे नाव बदलून डॉ. बी.आर.आंबेडकर कोनासीमा जिल्हा करण्याच्या प्रस्तावाविरोधात अमलापुरम शहरात बंद पुकारण्यात आला होता. या बंदला हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने परिवहन मंत्र्याच्या घरावर हल्ला करुन ते जाळलं. या वेळी पोलिसांची वाहने आणि बसही पेटवून देण्यात आली. यानंतर अमलापुरममध्ये जमावबंदी लागू करण्यात आली असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जमावाने केलेल्या हल्ल्यात 20 पोलीस जखमी झाले आहेत. तसेच, पोलिसांच्या लाठीमारात काही आंदोलकही जमखी झाले आहेत. पूर्व गोदावरी जिल्ह्यापासून वेगळे करत 4 एप्रिलला कोनासीमा जिल्ह्याची निर्मिती झाली. मागील आठवड्यात कोनासीमा जिल्ह्याचे नाव बदलून डॉ. बी.आर.आंबेडकर कोनासीमा जिल्हा करण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली. यानंतर काही घटकांनी नाव बदलण्यास विरोध केला. कोनासीमा साधना समितीने नाव बदलण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत जिल्ह्याचे आहे तेच नाव ठेवावे, अशी भूमिका घेतली होती.
सरकारच्या प्रस्तावाविरोधात काल कोनासीमा साधना समितीने ‘चलो कोनासीमा’चे आयोजन केले होते. या आंदोलनात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मागील आठवड्यातच जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर जमाव भडकला आणि दगडफेक सुरू केली. यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने पोलिसांची गाडी आणि बस जाळली. तसेच परिवहन मंत्री पी. विश्वरुपु यांच्या घरावर हल्ला करत जाळपोळ केली.
कोनासीमाचे पोलीस अधीक्षक के.एस.एस.व्ही. सुब्बा रेड्डी म्हणाले की, या धुमश्चक्रीत पोलिसांसह आंदोलक जखमी झाले आहेत. काल अमलापूरम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे क्लॉक टॉवरमार्गे मोर्चा निघाला होता. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरु केली आणि पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअक्षीक्षक यांच्या वाहनांना लक्ष्य करण्यात आले. जमाव वाढल्याने आणि सगळीकडून दगडफेक सुरू झाल्याने पोलिसांनी माघार घेतली. अखेर सायंकाळी जमावावर नियंत्रण मिळविण्यास पोलिसांना यश आले.
Discussion about this post