नवी दिल्ली । व्हीएसआरएस न्यूज ।
जगभरातील काही देशांमध्ये ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2ने धुमाकूळ घालत आहे. चीन, युरोप, अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जगात एकीकडे ओमिक्रॉनच्या सब व्हेरिएंटमुळे चिंता वाढली असली तरी भारतात मात्र कोरोना नियंत्रित आल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. सध्या भारतात २३ हजारांहून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. या दृष्टीकोनातून केंद्र सरकारने आता देशातील कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर निर्बंध लागू केले होते. पण आता केंद्राने हे कठोर निर्बंध शिथिल करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ३१ मार्चपासून देशभरात कोरोनाचे निर्बंध शिथिल होणार आहे. पण असे असले तरी मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे असणार आहे.
केंद्र सरकारने २४ मार्च २०२० रोजी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत पहिल्यांदा कोरोनाच्या मार्गदर्शन सूचना जारी केल्या होत्या. त्यानंतर कोरोना परिस्थितीनुसार अनेक वेळा मार्गदर्शन सूचनेत बदल करण्यात आले. आत सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला म्हणाले की, २४ महिन्यात महामारी व्यवस्थापनासाठी विविध प्रकारच्या क्षमतांचा विकास केला गेला. यामध्ये चाचणी करणे, देखरेख ठेवणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, उपचार, लसीकरण, रुग्णालयांचा विकास याचा समावेश आहे. यासोबत सर्वसामान्यांमध्ये कोरोनासंदर्भात जागरुकता वाढली आहे. ते कोरोनाला रोखण्यासाठी अनुकूल व्यवहार करू लागले आहेत.
Discussion about this post