नवी दिल्ली । व्हीएसआरएस ।
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे तब्बल ४० आमदार फोडून स्वतंत्रपणे गट स्थापन करण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या हातातून संपूर्ण शिवसेना पक्षच जाईल की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे शिवसेनेच्या तोंडाला अक्षरश: फेस आला आहे. या सगळ्यातून आता एकनाथ शिंदे किंवा पडद्यामागून त्यांना रसद पुरवणाऱ्या भाजपला कितपत फायदा होणार, हे माहिती नाही. मात्र, या बंडामुळे शिवसेनेवर ओढावलेल्या गंडांतरामुळे उद्धव ठाकरे यांच्या विरोधकांना नक्कीच आनंदाचे भरते आले आहे.
काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर येऊन हनुमान चालीस म्हणण्याचा आग्रहामुळे शिवसेनेशी वैर ओढवून घेणाऱ्या नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा या दाम्पत्याला शिवसेनेने चांगलाच हिसका दाखवला होता. राणा दाम्पत्याविरोधात शिवसेनेने मुंबईत जोरदार आंदोलन केले होते. नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेली साडेसाती आहेत. त्यांच्या काळात राज्याची पिछेहाट झाली असे, राणा दाम्पत्याने म्हटले होते. यानंतर राणा दाम्पत्याला तब्बल १४ दिवस तुरुंगात खितपत पडावे लागले होते. मात्र, तुरुंगातून बाहेर पडल्यानंतरही राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करण्याचे थांबवले नव्हते. त्यामुळे शिवसेना आणि राणा दाम्पत्यामध्ये सातत्याने शाब्दिक चकमकी सुरु असतात.
त्यामुळे आता शिवसेना आणि उद्ध ठाकरे सध्या कोंडीत सापडल्यामुळे राणा दाम्पत्याला आनंद झाला नसेल तर नवलच म्हणायला हवे. महाराष्ट्रात सध्या वेगवान राजकीय घडामोडी सुरु असतान खासदार नवनीत राणा या सध्या दिल्लीत आहेत. त्या शुक्रवारी भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संसद भवनात आल्या होत्या. त्यावेळी नवनीत राणा यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. आता हा आनंद नक्की कशामुळे होता, हे माहिती नाही. मात्र, महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे त्यांना इतका आनंद झाला असावा, ही शक्यता अगदीच नाकारता येणार नाही.
Discussion about this post