व्हीएसआरएस न्युज अहमदाबाद – यष्टीरक्षक जोस बटलरच्या दमदार फलंदाजीच्या जोरावार इंग्लंडने तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह इंग्लंडने पाच टी-20 सामन्याच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
भारताने इंग्लंडला विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान इंग्लंडने 18.2 षटकांमध्ये 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. जोस बटलर इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. जोस बटलरने 52 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या. तर जॉनी बेयरस्टोने 28 चेंडूत नाबाद 40 धावांची खेळी करत बटलरला चांगली साथ दिली.
तत्पू्र्वी इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली.
त्यानंतर भारताने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 156 धावा केल्या. भारतीय संघाकडून कर्णधार विराट कोहलीने 46 चेंडूत सर्वाधिक नाबाद 77 धावांची खेळी केली. तसेच हार्दिक पांड्याने 17 धावा करत विराटला चांगली साथ दिली. तर रिषभ पंतने 25 धावा केल्या. इंग्लंडकडून मार्क वुडने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.