व्हीएसआरएस न्युज भारताने विजयासाठी दिलेले 125 धावांचे लक्ष्य इंग्लंडने 15.3 षटकांत 2 गडी गमावत 130 धावा करत पार केले. सलामीवीर रॉयने आक्रमक फलंदाजी केली मात्र, त्याचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. राॅयने सर्वाधिक 49(32) धावा केल्या. त्यानंतर बटलरही स्थिरावल्यावर 28 धावांवर बाद झाला. त्यानंतर मात्र, मलान व बेअरस्टोने भारताला आणखी यश मिळू दिले नाही आणि संघास विजय मिळवून दिला.
मलानने नाबाद 24 तर बेअरस्टोने नाबाद 26 धावा करत विजय साकार केला. भारताकडून वॉशिंग्टन यजुवेंद्र चहलने 4 षटकांत 44 धावा तर सुंदरने 2.3 षटकांत 18 धावा देत 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय त्यांच्या गोलंदाजांपेक्षा भारतीय फलंदाजांनीच सार्थ ठरवला. भारताचे आघाडीचे तीन फलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकले नाही. शिखर धवन 4, लोकेश राहुल 1 आणि कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाला. तिघे बाद झाले तेव्हा संघाची 3 बाद 20 अशी स्थिती होती. मात्र, त्यानंतर रिषभ पंतने 21(23), श्रेयस अय्यरने 67(48) आणि हार्दिक पंड्याने 19(21) धावा करत भारतीय संघाचा डाव सावरला. त्यानंतर सुंदरने नाबाद 3 आणि अक्षर पटेलने नाबाद 7 धावा करत भारतीय संघाची धावसंख्या 20 षटकांत 7 बाद 124 वर नेली.
इंग्लंडक़डून जोफ्रा आर्चरने 4 षटकांत 23 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर आदिल राशिद, मार्क वुड, ख्रिस जॉर्डन, बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
सलामीवीर जेसन रॉय, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो व डेव्हिड मलान यांच्या फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताचा 8 गडी राखून पराभव केला व 1-0 अशी आघाडी घेतली.
इंग्लंडचा संघ : जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक), डेविड मलान, जॉनी बेयरस्ट्रो, इयॉन मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, सॅम कुरेन, जोफ्रा आर्चर, क्रिस जार्डन, अदिल राशिद, मार्क वूड.
भारत: केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, रिषभ पंत, (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल.