व्हीएसआरएस न्युज मुंबई : दान आणि पुण्याचा सण म्हणजे मकर संक्रांत आज संपूर्ण देशात मोठ्या (Makar Sankranti 2021) उत्साहाने साजरा केला जात आहे.
मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात आणि हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येणारा एक महत्त्वपूर्ण सण आहे. या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला संक्रांति म्हटलं जातं. या दिवशी सूर्य हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांत म्हणतात.
मकर संक्रांतच्या दिवशी बरेच महत्वाचे ग्रह एकत्रित येतात.
या दिवशी सूर्य, शनि, गुरु, बुध आणि चंद्र मकर राशीत राहतील. जे शुभ योग निर्माण करतात. म्हणूनच या दिवशी केलेले दान तुमच्या जीवनात पुण्य, आनंद आणि समृद्धी आणते.
मकर संक्रांतच्या दिवशीच भागीरथच्या विनंती आणि तपस्येने प्रसन्न होऊन गंगा त्यांच्या मागे-मागे कपिल मुनी यांच्या आश्रमात पोहोचली आणि तिथून ती समुद्रात जाऊन मिसळली. याच दिवशी राजा भागीरथने गंगेच्या पवित्र जलने आपल्या पूर्वजांचं तर्पण केलं होतं. त्यामुळे मकर संक्रांतच्या दिवशी गंगेत स्नान करणे अत्यंत शुभ आणि लाभदायी मानलं जातं.
यादिवशी गंगेत स्नान केल्याने सर्व पापातून मुक्तता मिळते. यादिवशी केलं जाणारं स्नान आणि दान वैकुंठात असलेल्या देवांपर्यंत पोहोचतं, अशी मान्यता आहे. जे लोक गंगेत स्नान नाही करु शकत ते घरीच पाण्यात गंगा जल मिसळून स्नान करु शकतात.
यावर्षी मकर संक्रांतला पूजा करण्यासाठी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.46 ही वेळ शुभ आहे. त्यामुळे तुम्ही या वेळेत पूजाविधी करु शकता. तसेतर नेहमी हा सण 14 जानेवारी रोजी येतो. परंतु, एखाद्या वर्षी ही तारीख मागे-पुढे होते. हिंदू धर्मामध्ये संक्रांत ही एक देवता मानली जाते. पौराणिक कथेनुसार, ही देवता दरवर्षी येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते.
मकर संक्रात पूजाविधी
मकर संक्रातच्या दिवशी अंघोळ करुन सूर्याला अर्घ्य द्यावे. या दिवशी महिला पूजा करतात. नंतर विवाहित स्त्रिया सुगड म्हणजे छोट्या मातीच्या मडक्यांना हळदी-कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळतात. सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे, शेंगा, कापूस, हरभरे, तीळगूळ, कच्ची खिचडी, इत्यादी भरतात. हे सुगडं पाटावर ठेवून त्या भोवती रांगोळी काढली जाते. यातील एक सुगड देवासमोर आणि एक सुगड तुळशीजवळ ठेवलं जातं. त्यानंतर किमान पाच सवाष्णींना वाण देतात. या दिवशी हळदीकुंकू समारंभ करुन तीळगूळ वाटतात. तुम्ही मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकू समारंभ करु शकता.
आपण जर दररोज सूर्याच्या उगवण्याच्या किंवा मावळण्याच्या जागेचे निरीक्षण केले तर सूर्याची बदललेली जागा लक्षात येईल. ज्यावेळेस पृथ्वीची उत्तर ध्रृवाकडील बाजू सूर्याच्या जवळ येते तेव्हा सूर्य जास्तीत जास्त उत्तरेला सरकलेला असतो. 21 मार्च ते 21 जूनपर्यंत सूर्य उत्तरेला सरकतो. यालाच ‘उत्तरायण’ असे म्हणतात. तर 22 सप्टेंबर ते 22 डिसेंबरपर्यंत सूर्य दक्षिण दिशेला सरकतो. यालाच ‘दक्षिणायन’ असे म्हणतात. तर 22 मार्च आणि 22 सप्टेंबर या दोन दिवशी सूर्य बरोबर पूर्व दिशेला उगवतो. या दोन तारखांना ‘विषुवदिन’ असे म्हणतात. या दिवशी दिवस-रात्र समान बारा-बारा तासांचे असतात.
मकर संक्रांत देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने साजरी केली जाते. दक्षिण भारतात पोंगल, गुजरात आणि राजस्थानात याला उत्तरायण म्हणतात. या दोन राज्यांमध्ये या दिवशी पतंग महोत्सव साजरा केला जातो. हरयाणा आणि पंजाबमध्ये या दिवशी माघी आणि उत्तर प्रदेशात पूर्वांचल, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या अनेक भागांमध्ये याला खिचडी म्हटलं जातं.
संकरासुर राक्षस जनतेचा फार छळ करीत असे. यामुळे सर्व लोक हैराण झाले होते. या राक्षसाचा नि:पात करण्यासाठी परमेश्वराने संक्रांत देवीचा अवतार धारण करुन त्या संकरासुराचा वध केला. लोकांचे संकट निवारण होउन सर्व जनता सुखी झाली, अशी आख्यायिका आहे. या देवीला अनेक हात आहेत. एखाद्या वाहनावर बसून वस्त्रालंकारानी सुशोभित होऊन, हातात विविध शस्त्रे घेऊन ती एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जात असते. असे वर्णन पंचांगात दिलेले आहे. संक्रांतीचे वर्णन प्रत्येक वर्षी निरनिराळे असते. विशेष म्हणजे संक्रांत देवीस ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींची महागाई होते असे मानतात.