व्हीएसआरएस न्युज
हरिद्वार – कुंभमेळा हा हिंदुंसाठी सर्वात पवित्र असा धार्मिक कार्यक्रम असतो. कुंभमेळा एका ठिकाणी बारा वर्षांनी होत असतो. याआधी 2010 मध्ये याठिकाणी कुंभमेळा झाला होता. आता 2022 मध्ये होणे अपेक्षित असताना तो एक वर्ष आधीच म्हणजे 2021 मध्ये होत आहे. सुमारे शंभर वर्षांनंतर कुंभमेळा अलीकडे घेण्यात येत आहे. विशिष्ट शुभ दिवसांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख महंत नरेंद्र गिरी यांनी म्हटले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे करोनाच्या साथीमुळे गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपे होईल, असे मानले जात आहे. 1 जानेवारी ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत हा कुंभमेळा होणार आहे.
या कुंभमेळ्यात शाही स्नानाचे दिवस जाहीर करण्यात आले आहेत.
त्यानुसार 11 मार्च, 12 एप्रिल, 14 एप्रिल आणि 27 एप्रिल रोजी शाही स्नान होणार आहे. या दिवशी गंगेत स्नान करू इच्छिणाऱ्या भाविकांना स्नानासाठी विशिष्ट घाट निवडून तशी नोंद संकेतस्थळावर करावी लागणार आहे. प्रत्येक भाविकाला स्नानासाठी घाट निश्चित करून देण्यात येणार असून प्रत्येकाला स्नानासाठी 15 मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविकांना ई-पास देण्यात येणार असून त्यावर घाटापर्यंत जाणाऱ्या मार्गाचा नकाशा असेल.
कुंभमेळ्याचा परिसर आणि सर्व 107 घाटांची विभागणी लाल, पिवळा आणि हिरव्या झोनमध्ये करण्यात आली आहे. गर्दी, करोनाचा फैलाव होण्याची शक्यता, संवेदनशीलता या आधारावर हे झोन निश्चित करण्यात आले आहेत. संपूर्ण परिसराचे जीआयएस मॅपिंग करण्यात आले आहे. त्यामुळे एखाद्या भागात परवानगीपेक्षा अधिक लोकांची गर्दी झाली तर प्रशासकीय नियंत्रण कक्षाला अलर्ट मिळणार आहे. त्यानुसार गर्दी कमी करण्यासाठी जवळच्या सुरक्षा रक्षक दलांना संदेश पाठवला जाईल. प्रत्येक घाटावर किती गर्दी असावी हे निश्चित करण्यात आले आहे. मागील काळात सकाळी किंवा दुपारनंतर लोकांनी स्नानासाठी गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. गर्दीची घनता कमी रहावी यासाठी स्नानाची वेळ प्रशासनाकडून वाढवून देण्यात येईल. शाही स्नानांच्या दिवशी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यावेळी कुंभमेळाच्या सीमेवरच ज्या भाविकांकडे ई-पास असेल त्यांनाच आत सोडले जाणार आहे.
हरिद्वारमध्ये 2010 मध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या कालावधीत 70 लाख भाविकांनी भेट दिली होती. पर्यटनावर अवलंबून असेलल्या उत्तरखंडच्या अर्थकारणावर यावेळी करोनाच्या साथीमुळे परिणाम झालेला आहे. वार्षिक चारधाम यात्रेलाही उशीरा आणि निर्बंध घालून परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळेच आता कुंभमेळ्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल अशी राज्याला आशा आहे. कुंभमेळ्याच्या कोणत्याही दिवशी हरिद्वारमध्ये सरासरी 1.25 लाख भाविक असतील या हिशेबाने नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शहरातील सुमारे 800 हॉटेल्स आणि 350 आश्रम सुसज्ज बनवण्यात येत आहेत.