नवी दिल्ली ।
सोनिया गांधी यांची ईडीकडून सलग दुसऱ्या दिवशी चौकशी सुरु असून, याविरोधात पक्षाकडून देशभरात आंदोलन केलं जात आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची सक्तवसुली संचालनायकडून (ईडी) चौकशी सुरु असून, याविरोधात पक्षाकडून देशभरात आंदोलन केलं जात आहे. दरम्यान राजधानी दिल्लीमधील आंदोलनात सहभागी झालेले राहुल गांधी यांच्यावर पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतलं आहे. याआधी २१ जुलैला ईडीने सोनिया गांधींची दोन तास चौकशी केली होती. ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात गेल्या महिन्यात राहुल गांधी यांच्यापाठोपाठ सोनिया गांधी यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, सोनिया गांधी यांना करोनाची लागण झाल्याने त्यांची चौकशी लांबणीवर गेली होती.
“मला खूप वेळा राजकारण सोडावंसं वाटतं”; नितीन गडकरींच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया, म्हणाले…
राहुल गांधी राजपथ मार्गावर रस्त्यावर बसून आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांना घेरलं होतं. तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केलं जात असल्याविरोधात तसंच महागाई, जीएसटी अशा अनेक मुद्द्यांवर राहुल गांधी आंदोलन करत होते. जवळपास अर्धा तास राहुल गांधी आंदोलन करत होते. यानंतर पोलिसांनी त्यांना उचलून ताब्यात घेतलेल्या इतर नेत्यांसोबत बसमधून नेलं.
पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजे असून, देशात पोलिसांचं राज्य आहे अशी टीका केली. पोलिसांनी आंदोलनानंतर सर्व कार्यकर्त्यांवर कारवाई केली तेव्हा राहुल गांधी एकटेच होते. राहुल गांधींवर कारवाई करायची की नाही याबाबत पोलिसांमध्ये चर्चा सुरु होती.
दरम्यान दुसरीकडे ईडीकडून नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांची चौकशी सुरु आहे. याआधी एकदा सोनिया गांधी यांची चौकशी करण्यात आली असून ही दुसऱी फेरी आहे. सोनिया गांधींसोबत प्रियंका गांधींदेखील ईडी कार्यालात पोहोचल्या होत्या. आंदोलनात सहभागी होण्याआधी राहुल गांधीदेखील तिथे पोहोचले होते.
काय आहे प्रकरण?
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेले ‘नॅशनल हेरॉल्ड’ वृत्तपत्र इ.स. २००८ साली बंद पडले. पं. जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटिश साम्राज्यशहांना विरोध करण्यासाठी १९३८ मध्ये सुरू केलेले हे काँग्रेसचे मुखपत्र होते. हे वृत्तपत्र बंद पडल्यानंतर ‘यंग इंडिया’ कंपनीने २०१० साली ते विकत घेतले. यंग इंडिया लिमिटेड या कंपनीची स्थापना नोव्हेंबर २०१० साली झाली होती. या कंपनीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा सर्वात मोठा म्हणजे ७६ टक्के वाटा होता. नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र २००८ पासून आर्थिक तोटा होत असल्याचं कारण देत बंद करण्यात आलं होतं. काँग्रेसने पुढे जाऊन ‘एजेएल’ला ९० कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज दिले. पक्षाने सांगितले की, हे पैसे वृत्तपत्राला परत आणण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात मदत करण्यासाठी होते. तथापि, वृत्तपत्राचे पुनरुज्जीवन होऊ शकले नाही आणि एजेएल कॉंग्रेसचे कर्ज फेडण्यात अपयशी ठरले.
२०१० मध्ये काँग्रेसने ‘एजेएल’कडे ९० कोटींच्या कर्जाची रक्कम परत मागितली. मात्र त्यावेळी कंपनीकडे एवढे पैसे नव्हते. त्यामुळे कंपनीने त्यांच्याकडील मालकी ही गांधींच्या मालकीच्या यंग इंडिया कंपनीकडे सुपूर्द केली. यासाठी यंग इंडियाने ‘एजेएल’ला केवळ ५० लाख रुपये दिले. याचवरुन गांधींनी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ताब्यात घेतली आणि या कंपनीच्या मालकीची २००० कोटींची संपत्तीही आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप केला जातोय.
नोव्हेंबर २०१२ मध्ये सुब्रह्मण्यम स्वामी यांनी या प्रकरणामध्ये खासगी तक्रार दाखल करत गांधी कुटुंबाने सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी त्यांच्या मालकीच्या यंग इंडिया लिमिटेडच्या मालकीची करुन घेतल्याचा आरोप केला. या करारामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना वृत्तपत्र छापण्याबरोबरच त्याच्याशीसंबंधित हजारो कोटींची दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील संपत्तीही मिळाल्याचा दावा स्वामींनी केलाय. तसेच काँग्रेसने या प्रकरणामध्ये दिलेलं कर्ज हे बेकायदेशीर असल्याचा दावा स्वामींनी केलाय. २०१३ साली सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली सत्र न्यायालयात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नॅशनल हेराल्ड प्रकरणात आयकर विभागाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी सुरु केली होती.
Discussion about this post