व्हीएसआरएस मराठी न्युज -विद्यार्थ्यांनी करिअर बाबतीत सजग राहत योग्य वेळी निर्णय घेणे महत्त्वाचे असून अनेक वेळा योग्य वेळी निर्णय न घेतल्यामुळे आपण अनेक संधीना मुकतो. त्यामुळे वाचन व आलेल्या अनुभवाने आपल्या उणीवा जाणून घेत स्वतःला विकसित करणे गरजेचे आहे.
तसेच आत्मपरीक्षणातून विकासाची नवीन दिशा मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करत भविष्याच्या दृष्टीने प्रगल्भ असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त मा. राजेश पाटील यांनी केले.
‘मोर ओडिशा डायरी: आयुक्तांचा युवकांशी सुसंवाद’ या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, सहा. आयुक्त अण्णा बोदडे, उपप्राचार्य डॅा. लतेश निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या नाविन्यपूर्ण उपक्रमाची संकल्पना व महत्त्व स्पष्ट करत अशा प्रकारच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागेल असे मत व्यक्त केले.
‘मोर ओडिशा डायरी: आयुक्तांचा युवकांशी सुसंवाद’ या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भारतीय प्रशासन सेवेतील कर्तव्यदक्ष अधिकारी राजेश पाटील यांनी आर्थिक स्थिती हलाखीची असताना देखील भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास उपस्थित विद्यार्थ्यांसमोर उलगडला. तसेच ओडिशा राज्यामध्ये काम करत असताना दुर्गम व आदिवासी भागामध्ये आलेली आव्हाने, स्थानिक प्रश्न याविषयी माहिती देताना मयुरभंज जिल्ह्यामध्ये वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘राईट टू एज्युकेशन’ अंतर्गत केलेल्या ‘मु बी पडीन’ या अभियानावर प्रकाश टाकला. या सुसंवाद उपक्रमामध्ये आयुक्तांनी प्रतिमा जेटीथोर, शुभम दौंड, हर्षदा फुगे, सुदर्शन गिराम, अनिकेत जाधव, तनय सुधार, अश्विनी दाभाडे, सानिका कुंभार या विद्यार्थ्यांनी प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना येणार्या अडचणी, लोकांचा सहभाग, राजकीय दबाव, ओडिशा राज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती हाताळतानाचा अनुभव व काम करत असताना घेतलेले अनेक धाडसी निर्णय यांवर विचारलेल्या प्रश्नांना मनमोकळेपणे उत्तरे देत त्यांच्याशी संवाद साधला.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये अॅड. संदीप कदम यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच आपले ध्येय निश्चित करण्याचे आवाहन करत काळानुरूप स्वतःला अद्ययावत ठेवण्याची गरज व्यक्त केली. तसेच ‘मोर ओडिशा डायरी’ हे पुस्तक वाचताना आलेला अनुभव कथन करत या उपक्रमातून भावी अधिकारी घडतील असा आशावाद व्यक्त केला.
या उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे सभागृहातील आसन क्षमता भरगच्च झालेली असताना प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या सूचनेनुसार या कार्यक्रमाचे यू – ट्युब लाईव्ह वर थेट प्रक्षेपण करण्यात आले. यामध्ये ॲाफलाईन व ॲानलाईन पद्धतीने सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधांनी युक्त महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय बालघरे तर आभार प्रदर्शन डॉ. क्रांती बोरावके यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र समिती सदस्यांसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Discussion about this post