जालना । व्हीएसआरएस न्यूज ।
महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस व नगरसेविका संध्या देठे बुधवारी पत्रकार परिषद घेतली होती आणि नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेली शहरातील विविध भागातील रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झाली आहेत. यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्या म्हणाल्या, ‘केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नाने जालना नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत आलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून झालेले रस्ते व भूमिगत गटार योजनेच्या कामात संबंधित कंत्राटदारास हाताशी धरून काही बाहुबली नगरसेवकांनी कोट्यवधी रुपये हडप केले आहेत.
शहरातील घायाळ नगर, इन्कम टॅक्स कॉलनी, सराफ नगर, भोईपुरा, सोनल नगर, नरिमान नगर, सुभद्रा नगर, तुळजाभवानी नगर, भाले कॉलनी या भागातील सिमेंट रस्ते अवघ्या तीन महिन्यांत पूर्ण उखडले आहेत. या रस्त्यांच्या कामात आणि प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत, याच भागातील भूमिगत गटारे न बांधता त्याची लाखो रुपयांची देयके उचलण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील निसर्ग गार्डन, तुळजाभवानी नगरमाता नगर, सोनल नगर या भागातील रस्ते दर दोन वर्षांनी परत एकदा बांधले आहेत. जुन्या बांधकाम झालेल्या रस्त्यावर नवीन बांधकाम केल्याचे दाखवून लाखो रुपयांचा मलिदा लाटण्याचे काम नगर परिषदेच्या बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, त्यांनी उपोषणाचा इशाराही दिला होता.
या पत्रकार परिषदेनंतर त्यांना धमकी देण्यात आली. ‘तुम्ही यापुढे नगर पालिकेच्या भ्रष्टाचाराबद्दल बोललात किंवा तक्रार केली, तर तुम्हाला बंदुकीतून गोळ्या घालून मारून टाकू, अशी धमकी त्या दोन व्यक्तींनी त्यांना दिली. देठे यांचे पती संजय देठे यांनी यासंदर्भात कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post