पिंपरी | (व्हीएसआरएस न्यूज) | रॅपिडोसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या दिवसाची सुनावणी संपली. या वेळी न्यायालयात रिक्षाचालक आणि रॅपिडो अशा दोघांच्या बाजू मांडण्यात आल्यानंतर पुढील दोन दिवसांनंतरची तारीख देण्यात आल्याची माहिती ऑटो, टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन व महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
पत्रकात असे म्हटले आहे की, रॅपिडो विरोधात हायकोर्टमध्ये सुरू असलेली लढाई रिक्षाचालकांनी जिंकल्यानंतर कंपनीने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. आता रिक्षाचालकांना सर्वोच्च न्यायालयात संघर्ष करावा लागणार आहे. न्यायालयात बाबा कांबळे व आनंद तांबे यांनी इंटरवेशन याचिका दाखल केली असून रिक्षा चालकांची बाजू ऐकल्याशिवाय कोणताच निर्णय घेऊ नये, अशी विनंती याचिका दाखल केली आहे. आता रॅपिडोवरील बंदी सर्वोच्च न्यायालयात कायम राहणार का? हा प्रश्न पुन्हा रिक्षाचालकांना पडला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांनंतर नेमकं न्यायालयात काय होणार, याची उत्सुकता लागली आहे.
Discussion about this post