चिंचवडमध्ये थांबा करण्याचीही केली विंनती
पिंपरी । (व्हीएसआरएस न्यूज) | राजस्थानमधील अनेक बांधव नोकरी-व्यावसायाच्या निमित्ताने पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्य करीत आहेत. त्यांची मूळगावी ये-जा प्रवास मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे पुणे-जयपूर-पुणे अशी रेल्वे प्रवासी सुविधा नियमित सुरू करावी. तसेच, चिंचवड स्टेशनला थांबा करावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत देशाचे रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, राजस्थानमधील लाखो बांधवांसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड म्हणजे ‘सेकंड होम’ म्हणून ओळखले जाते. नोकरी-व्यावसायानिमित्त नियमितपणे राजस्थान-पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, त्या तुलनेत सार्वजनिक प्रवासी सुधिका अत्यंत कमी आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून राजस्थानी बांधव पुणे-जयपूर- पुणे अशी रेल्वे सुविधा नियमित सुरू करण्याची मागणी प्रलंबित आहे.
सध्यस्थितीला पुणे-जयपूर- पुणे ट्रेन क्र. 12939/40 ही गाडी आठवड्यातून केवळ दोनवेळा सुरू आहे. ती नियमित सुरू करण्याची आवश्यकता आहे. तसेच या गाडीला चिंचवड थांबा देणे गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी होत आहे. राजस्थानी बांधवांकडून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे, असेही आमदार लांडगे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
व्यापार, व्यावसाय आणि नोकरीच्या निमित्ताने लाखो राजस्थानी बांधव पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्यास आहेत. राजस्थान-पुणे प्रवास करण्यासाठी सार्वजनिक प्रवास वाहतूक सुविधा अत्यल्प आहेत. आपल्या शहरात आलेल्या नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आपण लोकप्रतिनिधी म्हणून कटिबद्ध असतो. राजस्थानी बांधवांनी गेल्या अनेक वर्षांपासून पुणे-जयपूर-पुणे अशी रेल्वे नियमित सुरू व्हावी. या करिता मागणी केली आहे. त्याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना विनंती केली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.
– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
Discussion about this post