व्हीएसआरएस न्युज मुंबई माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती सक्तवसुली संचलनालयानं जप्त केली आहे.
मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलाचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दर महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप सिंग यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास ईडीकडून सुरू आहे.
ईडीनं अनिल देशमुखांना चौकशीसाठी वारंवार कार्यालयात बोलावलं.
त्यासाठी समन्स जारी करण्यात आलं. मात्र तीन समन्सनंतरही देशमुख ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. देशमुख यांच्या पत्नी आणि मुलगा यांनादेखील ईडीनं समन्स बजावलं होतं. मात्र हे दोघेही ईडीच्या कार्यालयात हजर राहिले नाहीत. १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप देशमुख यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच संदर्भात ईडीला त्यांच्या पत्नी आणि मुलाची चौकशी करायची होती.
भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं अनिल देशमुखांना एप्रिलमध्ये गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ईडीनं देशमुख यांच्याशी संबंधित मालमत्तांवर धाडी घातल्या. देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आली. या कारवाईवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार जुंपली आहे. ‘आता केवळ ४ लाख २० कोटी रुपये जप्त झाले आहेत.
लवकरच १०० कोटी जप्त होतील आणि देशमुखांवरदेखील जप्ती येईल’, असा दावा करत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी देशमुखांच्या अटकेचे संकेत दिले. त्याला राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. ईडी स्वायत्त संस्था आहे ना? मग त्यांच्या कारवाईची माहिती सोमय्यांना आधीच कशी मिळते? ते इतक्या विश्वासानं दावे कसे काय करतात? असे प्रश्न शिंदेंनी उपस्थित केले. ईडीनं सोमय्यांना वकिलपत्र दिलंय का असा सवालदेखील त्यांनी विचारला.
Discussion about this post