व्हीएसआरएस न्युज संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका ठेवत खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह 12 खासदारांना अधिवेशन काळासाठी निलंबित केलं.
हे खासदार सध्या संसदेच्या परिसरात आंदोलन करत आहेत. निलंबनाचा निर्णय एकतर्फी घेतल्याचा दावा प्रियंका चतुर्वेदींकडून केला जात असून, आज त्यांनी ‘संसद टीव्ही’वरील ‘मेरी कहानी’ कार्यक्रमाच्या अँकर पदाचाही राजीनामा दिला आहे.
‘दुःखद अंतःकरणाने मी ‘संसद टीव्ही’वरील ‘मेरी कहाणी’ कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या जबाबदारीतून बाजूला होत आहे. अशा पदावर राहू इच्छित नाही, जिथे माझी प्राथमिक अधिकारच हिरावून घेतले जात आहेत. हे सगळं 12 खासदारांच्या मनमानी निलंबनामुळे झालं असून, जितकी मी या कार्यक्रमाशी जोडली गेले होते, तितकीच दूर जात आहे’, चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.
‘राज्यसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक महिला खासदारांना संपूर्ण अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आलं आहे. मागील अधिवेशनातील वर्तणुकीमुळे 12 खासदारांचंही निलंबनही मी विसरु शकत नाही. संसदेच्या यापूर्वी असं कधीच घडलेलं नाही, असंही प्रियंका चतुर्वेदी यांनी राजीनाम्यात म्हटलं आहे.
Discussion about this post