नवी दिल्ली । व्हीएसआरएस न्यूज ।
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मध्यावर काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री अश्वनीकुमार यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘मी अत्यंत दु:खी मनाने हा निर्णय घेतला आहे. पक्षातील निष्ठावंत लोक हळूहळू पक्ष सोडत आहेत, याचा विचार पक्ष नेतृत्वाने करायला हवा. अस्मिता आणि आत्मसन्मान राखत मी हा निर्णय घेतला आहे, असे अश्विनीकुमार म्हणाले. ‘अशा बेफिकिरीचा भार पेलण्याइतके माझे खांदे मजबूत नाहीत. काँग्रेस आता पूर्वीसारखा पक्ष राहिलेला नाही. पुढील काळात पक्षाची राजकीय भूमिका आणखी कमी होईल. मी आता स्वबळावर राजकारण करेन आणि आपले भवितव्य स्वतःच ठरवेन. आज देशातील लोकांना त्यांच्याशी जोडणाऱ्या राजकारणाची गरज आहे, असे अश्विनीकुमार म्हणाले.
सोनिया गांधींकडे पाठवला राजीनामा
अश्विनीकुमार यांनी मंगळवारी सकाळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला. ‘काँग्रेस पक्षाबाहेर राहून देशाची अधिक चांगली सेवा करता यावी यासाठी मी पक्षाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. कुठल्या पक्षात प्रवेश करणार आहेत, याबाबत अश्विनीकुमार यांनी काहीही सांगितलेले नाही.
अश्विनीकुमार पंजाबमधून होते राज्यसभेचे खासदार
अश्विनीकुमार २००२ मध्ये पहिल्यांदा पंजाबमधून राज्यसभेचे खासदार झाले होते. यानंतर २००२ आणि २०१० मध्येही अश्विनीकुमार पंजाबमधून राज्यसभेवर निवडून आले. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये अश्विनीकुमार हे कायदा मंत्री होते. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अश्विनी कुमार यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने पक्षाला झटका बसला आहे. पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून काँग्रेसला अडचणींचा सामना करावा लागत आहे. तिकीट वाटपावरून नाराज झालेल्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडला आहे. पंजाबमधील विधानसभेच्या सर्व ११७ जागांसाठी २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल १० मार्चला लागणार आहे.
Discussion about this post