Pimpri News : पिंपरी : शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना अंडी वाटपाचा निर्णय राज्य शासनाने २० तारखेपूर्वी मागे घ्यावा अन्यथा या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा भाजप अध्यात्मिक आघाडीने दिला आहे.
या संदर्भात भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले म्हणाले,राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय चुकीचा आणि दुर्दैवी आहे. विद्यार्थ्यांना आहारातून प्रथिने मिळावीत हा शासनाचा हेतू चांगला असला तरी प्रथिने इतर अनेक शाकाहारी पदार्थातून मिळू शकतात हे शासनाने लक्षात घेतले पाहिजे.देशी गाईचं दूध, तूप, सुका मेवा यातून प्रथिने मिळू शकतात.
राज्यात कित्येक कुटुंबे शाकाहारी आहेत. वारकरी संप्रदाय आणि इतर अनेक अध्यात्मिक संप्रदाय राज्यात आहेत. ते शाकाहाराचा पुरस्कार करतात.अशा घरातील मुलांनी अजाणतेपणी अंडी खाल्ली तर त्यांच्या कुटुंबातील शुद्ध शाकाहारी नियम मोडण्याचा मोठा धोका सगळ्यांनाच सतावत आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घ्यावा.
यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकतेच पत्र दिले आहे.राज्यातील वारकरी संप्रदाय, आणि आध्यात्मिक क्षेत्राची भावना अशीच आहे. २० तारखेच्या आत हा निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन केले जाईल. अंडी शाळांपर्यंत पोहोचूच देणार नाही, असा इशारा तुषार भोसले यांनी दिला आहे.
Discussion about this post